

खानिवडे ः वसई पूर्वेतील नायगाव जूचंद्राच्या परिसरात बुधवारी पहाटेच्या प्रहरात एक प्रवासी रिक्षा खोदलेल्या गटारात पडल्याची घटना घडली. मालजीपाडा येथील एका रिक्षाचालकाची चंद्रपाडा गावात एका हॉटेलच्या बाजूला सुरू असलेल्या नाल्याजवळ ही दुर्घटना घडली.
कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र्याच्या बोर्डाला रिक्षाची धडक लागल्याने चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले व रिक्षा खोदून ठेवलेल्या नाल्यात पडली अशी माहिती मिळाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेमुळे पावसा अगोदर जर हे काम उरकले नाही तर मोठा अनर्थ होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
येथील उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या या रस्त्यावर आधीच अनेक अडथळे आहेत. त्यात आता गटाराचे काम सुरू झाले आहे. भरवस्तीच्या नायगाव ते बापाने फाटा महामार्गा पर्यंत एकमेव असलेल्या या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ सुरूच असते.
त्यामुळे घडलेल्या या घटनेची संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन त्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था करावी व पावसाळ्यापूर्वी गटाराचे काम पूर्ण करावे अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे समाजसेवी नरेंद्र पाटील यांनी माहिती देताना सांगितले.