

पालघर : पाकिस्ताच्या समुद्री हद्दीत मासेमारी करताना प्रवेश केल्यामुळे गुजरातच्या ओखा-पोरबंदर येथील तीन ट्रॉलरसह काही भारतीय खलाशांना पाकने ताब्यात घेतले आहे. यात पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील नामदेव बाळकृष्ण मेहेर यांचा समावेश आहे. नामदेव मेहेर यांच्या सुटकेसाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी मेहेर कुटुंबीयांनी केली आहे.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी, डहाणू, तलासरी तालुक्यांतील अनेक मच्छीमार खलाशी चांगला पगार, मोबदला मिळवण्यासाठी गुजरातच्या ओखा, पोरबंदर, वेरावळ भागातील बोटींवर खलाशी कामगार म्हणून जात असतात. नामदेव बाळकृष्ण मेहेर (वय 65) हे सातपाटी येथील मच्छीमार खलाशी ओखा-पोरबंदर येथील नल नारायण या जयंतीभाई राठोड यांच्या ट्रॉलरवर कामासाठी गेले होते.
खोल मासेमारी करत असताना नल नारायण या ट्रॉलर बोटीने चुकून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केला. पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याने पाकच्या मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीकडून नल नारायण ट्रॉलर व त्यावर असलेल्या मच्छीमार खलाशांना ताब्यात घेण्यात आले.
याबाबतची माहिती गुरुवारी नामदेव मेहेर यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला पाकने अटक केल्याच्या या घटनेमुळे मेहेर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ते अत्यंत दडपणाखाली आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाकडून सुटकेसाठी प्रयत्न सुरू
पाकिस्तानी सैनिकांनी समुद्रात पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केल्याच्या आरोपावरून तीन ट्रॉलर ताब्यात घेत त्यावरील मच्छीमार खलाशांना अटक केल्याची माहिती आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याची इंडिया-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रॅसी या संस्थेचे माजी पदाधिकारी जतिन देसाई यांनी दिली आहे.