

पालघर ः आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि मागणीनुसार खत उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने व्यापक नियोजन केले असून जिल्हाभर खत साठा, वितरण व्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.पालघर जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी पालघर जिल्ह्यास 12 हजार 800 मेट्रिक टन युरिया तसेच 3 हजार 150 मेट्रिक टन संयुक्त खताचा साठा मंजूर करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 1 हजार 754 मेट्रिक टन खत उपलब्ध असून त्यामध्ये 754 मेट्रिक टन युरिया आणि 1 हजार मेट्रिक टन संयुक्त खताचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असल्याने युरिया आणि संयुक्त खताला विशेष मागणी असते.
ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना रास्त दरात आणि वेळेवर खते उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने विशेष उपाययोजना आखल्या आहेत. खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि साठेबाजीला आळा बसावा यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पॉइंट ऑफ सेल मशीनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
जिल्ह्यात खाजगी वितरक तसेच सहकारी संस्थांच्या माध्यमातून खत पुरवठा केला जात असून जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकरी खत खरेदीस सुरुवात करत असल्याने त्यानुसार साठा आणि वितरणाचे बारकाईने नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय खत विक्रेते, बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी, महाबीज आणि आरसीएफ यांची समन्वय बैठक येत्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
दरम्यान, “खताचा पुरेसा साठा उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही अडचण असल्यास थेट कृषी विभागाशी संपर्क साधावा. खरीप हंगामात मागणीनुसार आवश्यक तेवढा खतपुरवठा करण्यात येईल,” असा विश्वास कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद पालघर सोमनाथ पिंजारी यांनी व्यक्त केला.