

लातूर : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आगामी खरीप हंगामासाठी सर्व प्रकारची रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची खत टंचाई नसल्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली आहे. हवामान खात्याने यंदा मान्सूनवर एल निनोचा परिणाम होऊन पावसाची अनिश्चितता वर्तविली असल्याने, शेतकऱ्यांनी खतांची आगाऊ खरेदी करून साठवणूक करण्याची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
सध्या जिल्ह्यामध्ये एकूण 75 हजार 167 मेट्रिक टन खत साठा उपलब्ध असून, यामध्ये 38 हजार 444 टन संयुक्त खते, 16 हजार 82 टन सिंगल सुपर फॉस्फेट, 11 हजार 436 टन युरिया, 8 हजार 311 टन डीएपी आणि 894 टन एमओपी खताचा समावेश आहे.
तालुकानिहाय उपलब्धतेमध्ये लातूर तालुक्यात सर्वाधिक 2936 टन युरिया व 1824 टन डीएपी साठा असून, अहमदपूर (युरिया 1562, डीएपी 942), निलंगा (युरिया 1473, डीएपी 1345), औसा (युरिया 1398, डीएपी 570) आणि उदगीर (युरिया 726, डीएपी 730) या तालुक्यांचा क्रमांक लागतो. तसेच चाकूर, रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ आणि जळकोट या तालुक्यांमध्येही खतांचा पुरेसा साठा केंद्रांवर उपलब्ध आहे.
जरी आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असली तरी त्याचा देशांतर्गत खत पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता गरजेनुसारच खत खरेदी करावी. प्रत्येक कृषी सेवा केंद्रनिहाय उपलब्ध साठा पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या अधिकृत ब्लॉग लिंकचा किंवा क्यूआर कोडचा वापर करावा, असेही कृषी विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.