

मोखाडा : पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणाऱ्या मोखाडा तालुक्यातच वृक्षांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या झाडांवर खिळे ठोकून विविध जाहिराती, वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक, राजकीय बॅनर तसेच व्यावसायिक पोस्टर्स लावण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. या प्रकारामुळे वृक्षांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून पर्यावरणप्रेमींनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
तालुक्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवर झाडांच्या खोडांमध्ये मोठमोठे खिळे ठोकून फलक लावण्यात आलेले दिसून येतात. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी झाडांना जखमी करण्याचा हा प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, झाडांच्या खोडात ठोकलेले खिळे त्यांच्या नैसर्गिक वाढीस अडथळा निर्माण करतात.
खिळ्यांमुळे झालेल्या जखमांमधून बुरशी, कीटक आणि विविध रोगजंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. परिणामी झाडांची प्रतिकारशक्ती कमी होऊन ती कमकुवत बनतात. अनेक वर्षांच्या संगोपनातून वाढलेली झाडे अशा प्रकारांमुळे हळूहळू मृत्यूच्या दिशेने वाटचाल करू शकतात.
एकीकडे शासन आणि प्रशासनाकडून वृक्षारोपण, हरित अभियान आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे, तर दुसरीकडे त्याच वृक्षांवर खिळे ठोकून त्यांचे नुकसान होत असल्याचे विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे.
लाखो रुपये खर्च करून वृक्षारोपण करणाऱ्या यंत्रणांनी अशा प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. “माणसांच्या प्रसिद्धीसाठी लावलेले फलक काही दिवस टिकतात; मात्र त्यासाठी जखमी झालेली झाडे अनेक वर्षे वेदना सहन करतात,” अशी भावना अनेक पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी संबंधित विभाग, ग्रामपंचायत, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने अशा प्रकारांवर कठोर कारवाई करून झाडांवरील फलक हटवावेत तसेच दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण संवर्धन प्रेमीनी केली आहे.