

कासा : डहाणू तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी देवीची प्रसिद्ध यात्रा 2 एप्रिलपासून सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व्यापक तयारीला सुरुवात केली आहे. या यात्रेत महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातील भाविक देखील मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. यात्रेमध्ये शेकडो विविध दुकाने तसेच मनोरंजन , खेळ, तसेच विविध संसार उपयोगी साहित्याची मोठी बाजारपेठ मांडलेली असते.
या यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीमुळे कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये, येणाऱ्या भाविका ंच्या पार्किंगची व्यवस्था जाण्याचे येण्याचे मार्ग नीट असावेत. यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी विशाल खत्री यांनी दिले. महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट कार्यालयात बुधवारी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची, ट्रस्ट पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. सलग 15 ते 20 दिवस चालणाऱ्या या यात्रेत राज्याबाहेरील लाखो भाविक सहभागी होत असल्याने कायदा व सुव्यवस्था, तसेच भाविकांच्या सोयीसुविधा यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीत स्वच्छतागृहांची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, वाहतूककोंडी, पार्किंग व्यवस्था, वीजपुरवठा आणि यात्रेतील दुकानांची गर्दी या प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात्रेदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून टेहळणी पथकेही तैनात केली जाणार आहेत. महालक्ष्मी ट्रस्टकडून यात्रेसाठी विविध सुविधा उभारण्यात आल्या आहेत. सुमारे 54 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, 60 सुरक्षा रक्षक, 20 स्वयंसेवक व 16 सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी कुलर व पाणपोई, कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाड्या, तसेच सोलर यंत्रणेद्वारे वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसराची स्वच्छता करून
आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. तहसीलदार सुनील कोळी यांनी पाणीपुरवठा, मोबाईल शौचालये, अग्निशमन दल, वैद्यकीय सेवा, वीज वितरण, कचरा व्यवस्थापन, पार्किंग व रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था याबाबत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, पोलीस निरीक्षक अमर पाटील, बांधकाम विभागाचे नितीन पगारे, ट्रस्ट अध्यक्ष संतोष देशमुख, शशिकांत ठाकूर, सरपंच नितेश भोईर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मोठ्या संख्येने दुकानदार उपस्थित होते. यात्रेच्या तयारीचा पुढील आढावा पुढील आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
प्रांताधिकारी विशाल खत्री यांनी पार्किंगची जबाबदारी संबंधित जागाधारकांवर राहील, तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक दुकानदाराकडे अग्निशमन यंत्र व कचरा पेटी असणे आवश्यक असून, नियमांचे पालन करणाऱ्या विक्रेत्यांनाच परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. उड्डाणपुलाखाली दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली असून, डोंगरावरील मार्गांवरही स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले.