

पालघर ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरई गावाच्या हद्दीतील वांद्री नदीवरील पुलावरून दुचाकीस्वार थेट चाळीस फूट खोल नदी पात्रात कोसळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास वरई उड्डाणपुलाच्या गुजरात मार्गीकेवरील उतारावर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार नदी पात्रात कोसळून अपघात झाला होता. महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीला गंभीर जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी मनोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वरई फाटा उड्डाणपुलाच्या गुजरात मार्गिकेवरून एक दुचाकीस्वार गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. दरम्यान, उड्डाणपुलाच्या उतारावरील वांद्री नदी पुलाच्या वळणावर त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट पुलावरून चाळीस फूट खोल वांद्री नदीच्या पात्रात कोसळली. अपघातात दुचाकीस्वाराला दुखापत झाली.
महामार्ग सुरक्षा पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी दुचाकीस्वाराला नदी पात्रातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे. महामार्गावर अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रणा सह नियमांचे पालन करण्याचे आवाहन महामार्ग सुरक्षा विभागाने केले आहे.