

पालघर शहर : केळवे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या दोन मुलींना घोडागाडी (टांगा) धडक दिल्याने तेरा वर्षीय आणि एक वर्षीय मुलगी अशा दोन मुली जखमी झाल्याची घटना घडली आहे. जान्हवी महेंद्र पाटील (वय 13) आणि सिया महिंद्र पाटील (वय 1) अशी जखमी मुलींची नावे असून याप्रकरणी आरोपी घोडागाडी चालकाविरोधात केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केळवे समुद्रकिनारी पालघर येथील टेंभोडे स्वस्तिक इलाईट बिल्डिंग परिसरातील महिलांसोबत जान्हवी महेंद्र पाटील आणि सिया महेंद्र पाटील दोन चिमुकल्या मुली देखील सोमवारी 26 जानेवारी रोजी सुट्टी असल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आल्या होत्या. सुट्टी असल्याने केळवे समुद्र किनारी मोठी गर्दी होती. दुपारच्या सुमारास सिया आणि जान्हवी समुद्रकिनारी खेळत असताना अचानक भरधाव वेगातील घोडागाडीने या दोनही मुलींना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात दोनही मुली जखमी झाल्या.
भरधाव वेगतील घोडा गाडीचे चाक जान्हवीच्या पोटावरून गेल्याने गंभीररित्या जखमी झाली. गंभीरित्या जखमी झालेल्या जान्हवीला तातडीने प्रथम पालघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जान्हवीला अधिक उपचारासाठी मुंबईतील अंधेरी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घोडागाडी भरधाव वेगात निष्काळजीपणे, हायगईने चालवून दोघांना टांग्याची धडक देऊन दुखापत केल्यामुळे घोडागाडी (टांगा) मालक चेतन घरत (रा. विळंगी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास केळवे पोलीस करीत आहेत.