

विरार : वसई-विरार महानगरपालिकेने घनकचरा विल्हेवाटीच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत संबंधित ठेकेदारावर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. तब्बल 24 महिने उलटूनही ठेकेदाराकडून कचऱ्यावर कुठलीही वैज्ञानिक प्रक्रिया न करता तो थेट डंपिंग ग्राउंडवर टाकला जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे परिसरात मिथेन वायू तयार होऊन वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे.
विल्हेवाटीसाठी जमा होणारा कचरा ऑर्गेनिक, इनर्ट तसेच इतर राज्यांतील सिमेंट कंपन्यांकडे पाठवणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात अल्ट्राटेक सिमेंट आणि डालमिया भारत सिमेंट लिमिटेड यांना दिले जाणारे कचऱ्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, कागदोपत्री मोठ्या प्रमाणात कचरा विल्हेवाट लावल्याचे दाखवून ठेकेदाराने महानगरपालिकेकडून तब्बल 34 कोटी रुपयांची बिले उचलल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठाम संशय व्यक्त करत महानगरपालिका आयुक्तांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. ठेकेदाराने केलेल्या कामाची प्रत्यक्ष तपासणी करून कागदोपत्री दाखवलेले आकडे व प्रत्यक्ष स्थिती यांची पडताळणी केली जाणार आहे.
दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश
यासोबतच, कचरा विल्हेवाटीच्या प्रक्रियेत नियमभंग झाला का, पर्यावरणीय नुकसान झाले का, तसेच आग लागण्याच्या घटनांना ठेकेदाराची हलगर्जी जबाबदारी कारणीभूत आहे का, याचाही तपास केला जाणार आहे. या चौकशीसाठी संबंधित विभागांना आवश्यक ती कागदपत्रे जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांमार्फत सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाला या संपूर्ण व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.