पालघर : वाड्यात शाळकरी मुलीचे अपहरण, १२ तासांच्या आत आरोपी गजाआड
वाडा; पुढारी वृत्तसेवा : शुक्रवारी सायंकाळी शहरातील अशोकवन भागात राहणाऱ्या अल्पवीन मुलीचे अज्ञातांनी अपहरण केले. याबाबत मुलीच्या वडिलांनी वाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. वाडा पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली असून मुलीची सुखरूप सुटका केली.
वाडा पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या अशोकवन भागात राहणाऱ्या विश्वास शेलार यांची बारा वर्षांची मुलगी शाळा सुटल्यावर घरी आली. मात्र जिन्यातून तिचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले. पांढऱ्या रंगाच्या एका गाडीत तिला नेले असल्याची शंका अनेकांनी व्यक्त केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घटना वाऱ्यासारखी पसरली. मुलीच्या वडिलांनी रितसर तक्रार दाखल केल्यावर पोलीस यंत्रणा कामाला लागली.
तांत्रिक पुरावे व अन्य माहिती आधारे पोलिसांनी अवघ्या बारा तासांत तालुक्यांतील ऐनशेत गावातून मुलीची सुखरूप सुटका करून एका आरोपीला ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपींचा शोध पोलीस घेत असून हे प्रकरण आर्थिक व्यवहारातून झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा