राज्य सरकारने १९८० ते २०२० या कालवधीत दस्तनोंदणीवर कमी मुद्रांक शुल्क भरलेल्यांसाठी मुद्रांक अभय योजना सुरू केली आहे. या योजनेचा दुसरा टप्पा रविवारी (३० जून) संपला. मात्र, योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेंतर्गत अर्ज करता येणार आहेत.
१९८० ते २०२० या कालावधीत सदनिका घेतली असेल, मात्र मुद्रांक शुल्क कमी भरले असेल किंवा दहा रुपयांच्या मुद्रांकावर विक्री करारनामा केल्यानंतर नोंदणीसाठी दाखल केले नाही.
बाजारभाव विचारात न घेता दस्तामध्ये दाखविलेल्या रकमेवरच मुद्रांक शुल्क भरले अशा सदनिकाधारकांसाठी राज्य सरकारने ही योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये १जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या कालावधीसाठी पहिला, तर १ जानेवारी २००१ ते २०२० या कालावधीतील दस्तांसाठी दुसरा असे दोन टप्पे करण्यात आले आहेत.
१ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत पहिला टप्पा राबविण्यात येणार होता. मात्र पहिल्या टप्प्याला २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यातील योजना सुरू आहे.
या योजनेत अर्ज करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत होती. मात्र, त्यामध्ये वाढ करीत राज्य सरकारने ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत रविवारी संपली. मात्र, दुसऱ्या टप्प्यालाही मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार ३१ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत.