नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील राजकीय घडामोडी, आगामी धार्मिक सण-उत्सवांसह वादग्रस्त विधानांमुळे होणारी निदर्शने, आंदोलने यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी 28 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रावणमासाची सुरुवात होत असून, नागपंचमी, मोहरम, रक्षाबंधन असल्याने बाजारात वर्दळ राहणार आहे. राजकीय बंडाळीमुळे त्याचे पडसाद शहरातही उमटत आहेत. शहरात शांतता राहावी, समाजकंटकांकडून उपद्रव होऊ नये यासाठी पोलिस आयुक्त यांनी शहरात पंधरा दिवस मनाई आदेश लागू केले आहेत.