सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा :
नाशिकमधील ठाणगाव परिसरातील पाडळी येथे ठाकरवाडी या ठिकाणी रविवारी (दि. 27) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. संजय राधाकिसन वारघडे यांचे घर असून ते कुटुंबासह गहू, हरभरा, गवत कापण्याच्या कामासाठी गेले होते. शेजारी कविता उघडे, सविता वारघडे, मनीषा वारघडे, सुरेश वारघडे यांना बंद घरातून धुराचे लोट बाहेर येताना दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील ठाकरवाडी येथील गणपत वारघडे यांनी माजी सरपंच चंद्रभान रेवगडे यांना भ्रमणध्वनीवरून आगीची माहिती दिली.
चंद्रभान रेवगडे यांनी ग्रामस्थांसह ठाकरवाडीकडे धाव घेतली. घराला लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीतून तसेच घरांतून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत घरात साठवलेले गहू, भात, ज्वारी, बाजरी असे वर्षभराचे 10 ते 12 पोते धान्य व दैनंदिन खर्चासाठी घरात ठेवलेल्या 14 ते 15 हजार रुपये व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यावेळी चंद्रभान रेवगडे, संदीप रेवगडे, सुनील रेवगडे, रमेश वारघडे, रवि वारघडे, अरुण वारघडे, खंडू वारघडे, गणेश रेवगडे, रेवन गोसावी, गणेश वारघडे, शिवाजी उघडे यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. यावेळी तलाठी यू. एल. कोलांडे, ग्रामसेविका एस. ए. बिडवे, पोलिस पाटील परिघा पाटोळे यांनी घटनेचा पंचनामा केला.
माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी या कुटुंबाला मदतीचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी वारघडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करीत मदतीचे आश्वासन दिले. वारघडे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थती नाजूक असून कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे. वाजे यांनी नुकसानीची पाहणी केली. आपत्तीग्रस्त कुटुंबाला शासनस्तरावरुन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तहसीलदार व गटविकास अधिकार्यांशी मोबाइलवरून संपर्क साधत मदत करण्याच्या सूचना केल्या. पाडळीचे सरपंच व ग्रामसेवक यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत वारघडे कुटुंबीयांना नवीन घरकुल मंजूर करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी नामदेव शिंदे, सरपंच सुरेखा रेवगडे, योगेश रेवगडे, संपत शिरसाट, तलाठी उषा कोलांडे, ग्रामसेविका सारिका बिडवे, पोलिस पाटील परीघा पाटोळे आदी उपस्थित होते.