नाशिक : विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या प्रत्येकी दोन जागा व भाजप पक्षाच्या चार जागा रिक्त आहेत. एकूण 10 जागांसाठी उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. मात्र, भाजपने चारऐवजी पाच उमेदवार जाहीर केल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कंबर कसावी लागेल, असे सूचक विधान अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. राज्यसभेच्या निवडणुकीतही एक उमेदवार अधिक असल्यामुळे सर्व पक्षांची तयारी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
या दोन्ही निवडणुकींसंदर्भात मंगळवारी (दि.7) महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष व मित्र पक्षांची बैठक मुंबई येथे पार पडली आहे. या बैठकीत आम्ही सर्व जण एकत्र राहून राज्यसभेवरील आमचे उमेदवार निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला गेला. निवडणुकीसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अशी घटना घडणार नाही, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.