पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
मोबाईलमुळे सुसंवाद हरवला आहे. त्याचा अतिरिक्त वापर मानसिक रोग वाढीस कारणीभूत होत आहेत. माणसे एकलकोंडी बनत आहेत. ज्येष्ठावर त्याचा विशेष परिणाम होत आहे. म्हणून ज्येष्ठांनी अतिरेक टाळून व्यापक सुसंवाद वाढविण्यावर भर द्यावा. कारण, सुसंवादामुळे तणाव कमी होते. होण्याबरोबरच म्हातारपणही सुसह्य होण्यास मदत होत असल्याचे मत प्रसिद्ध विधीज्ञ संभाजी पगारे यांनी व्यक्त केले.
आ. मा. पाटील विद्यालयाच्या १९६८ सालातील एस.एस.सी च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा येथील दाजी साठे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योजक पंढरीनाथ कोठावदे उपस्थित होते. व्यासपीठावर माजी शिक्षण उपसंचालक एस. ए. पाटील, भालचंद्र दुसाने, माजी कृषी शास्त्रज्ञ डॉ. साहेबराव क्षीरसागर सूर्यकांत सासले उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी भगिनींना माहेरची साडी भेट म्हणून देण्यात आली. भगवान बागुल यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी एस. ए. पाटील, मिरा दुसाने, पंजाबराव पाटील, विजय चाळसे, श्रीधर कोतकर, चंद्रकांत जाधव, सुधाकर जाधव, सुभाष पाटील, कोतकर आदींनी शाळेच्या जुन्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विष्णू जिरे, एम. बी. पाटील, प्रमोद जगताप तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्ग आदींनी प्रयत्न केले. विजय सोनवणे यांनी ऐतिहासिक एकपात्री प्रयोग सादर केला. प्राचार्य उमेश माळी यांनी आभार मानले.