

[author title="नाशिक : नील कुलकर्णी" image="http://"][/author]
तणाव व्यवस्थापन शिकवणारे पालक, पालक-पाल्यांमधील सुसंवाद, जवळच्या व्यक्तीशी तणावाच्या काळात संवाद आणि शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना समुपदेशन सक्तीचे करणे, यामुळे निकालाच्या अपयशानंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबतील, असे मत मानसशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी व्यक्त केले.
दहावी-बारावीचे निकाल नुकतेच लागले आणि त्यामध्ये कमी मार्क मिळाले म्हणून जिल्ह्यातील ३ विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून मृत्यूला कवटाळले. भारत पौगंडावस्थेतील आणि तरुण लोकसंख्या देश म्हणून ओळखला जातो. युवावर्गचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 53.7 टक्के इतके आहे. देशातील भावी नागरिक आणि ही युवा संपत्ती अशी आत्मघाताने संपणार असेल तर तरुण राष्ट्राच्या मानवसंसाधन संपत्तीचा ही गंभीर बाब आहे. चिंताजनक बाब म्हणजे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, दर ४२ मिनिटांनी एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. म्हणजेच दररोज ३४ हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. कोविड काळ आणि त्यानंतरच्या काळात २०२३-२४ मध्ये हे प्रमाण दुपट्टीने वाढल्याचे आकडेवारी सांगते.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या तरुणाच्या आत्महत्या एका सविस्तर अहवालानुसार देशातील सुमारे ८.२ ते १२ टक्के विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग निवडून मृत्यूला कवटाळतात. त्यात भयंकर म्हणजे परीक्षत कमी गुण मिळणे, स्पर्धा परीक्षेतील अपयश आणि बेरोजगारी या कारणांनी जीवन संपवणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वतःला हानी पोहोचवण्याच्या वाढत्या घटनांचा सामना करण्यासाठी, केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला आहे. त्यानुसार जेव्हा विद्यार्थी त्यांच्या वैयक्तिक सामाजिक समस्यांचे व्यवस्थापन करू शकत नाहीत, तेव्हा त्याचा परिणाम दुःखी व्यक्तीमत्व, असंतोष, निराशा, मूड स्विंग, निराशा आणि अत्यंत टोकाला जात मग ते आत्महत्येचा मार्ग पत्कारतात. देशातील तरुणांचा असा ऱ्हास कुठल्याही देशाला परडवणारा नाही. यासाठी राजस्थान मधील कोटा शहरात अभियांत्रिकी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यसाठी पोलिस स्वयंसेवी संघटनांनी उभारलेली चळवळीची गरज नाशिकमध्ये सुरू व्हावी अशा अपेक्षा पालकांसह स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींचे करत आहेत.
शाळांनी स्कूल वेलनेस टीम तयार करावी आणि आत्मघाताची संकेत देणारे विद्यार्थी ओळखावेत. अशा विद्यार्थ्यांसाठी त्वरित प्रतिसाद आणि सहाय्यक उपाय दिले जातात. 'आत्महत्येबद्दल समज आणि तथ्ये', 'आत्महत्येवर परिणाम करणारे घटक' आणि 'जोखीम असलेल्या विद्यार्थ्यांची चेतावणी चिन्हे' यांचा समावेश आहे.
शाळांनी शिक्षक, शालेय कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थ्यांची कुटुंबे आणि इतरांसह सर्व भागधारकांची क्षमता निर्माण करण्यासाठी सक्रिय उपाययोजना कराव्यात. प्रत्येकजण आत्महत्येच्या विचारांनी प्रभावीत असलेल्या मुलांना ओळखण्यात आणि त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो, हे सुनिश्चित केले जाते.
शाळा कॉलेजमधील मुलांवर परीक्षेतील कामगिरी अधिक गुण मिळालाय हवे असा दबाव असतो. अधिक गुण म्हणजे यशस्वी करियर नव्हे. पालकही मुलांवर 'मार्क्सवादी' दृष्टीकोनच रुजवतात. शिक्षण हे आनंददायी व्हावे त्याचा तणाव मुलांवर येता कामा नये. इयत्ता दहावी व बारावी परीक्षा म्हणजे जीवनाचाी अंतिम परीक्षा नव्हे. जीवनाच्या परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर 'मार्क्सवादी' शिक्षणपद्धती बंद व्हावी, आनंददायी शिक्षण व्हावे आणि पालकांनीही मुलांना पसंत असलेल्या क्षेत्रातील करियरलाच प्रोत्साहन द्यावे. भरपूर गुणांपेक्षा व्यक्तीमत्व विकसित करणारे आनंददायी करिअर- मग ते कुठलेही असो-त्यासाठी पालकांनी आग्रह धरावा.
– डॉ. मृणाल भारद्वाज, मानसशास्त्रज्ञ, किशाेरवयीन मुलांच्या अभ्यासिका.
१)पालकांनी मुलांच्या मनोव्यापाराकडे बारकाईन लक्ष द्यावे.
२) पाल्य चिंतेत, काळजीग्रस्त असल्यास संवाद वाढवावा, एकट्याला सोडू नये.
३) परीक्षेतील मार्कासाठी आग्रह नको, सुसंवाद आणि त्याला मानसिक आधार द्यावा
४) प्रसंगी समुपदेशक, मानसशास्त्रज्ञांची, तज्ज्ञ डाॅक्टरांची मदत घ्यावी.
५) मुलांमधील अबोला, व्यसनाधीनता, एकलकोंडेपणा ओळखावा.
६) पाल्याने आत्महत्येचा विचार बोलून दाखवला त्या क्षणी पाल्य तणावात आहे हे ओळखावे.
७) तणावग्रस्त मुलांला त्याच्या आवडीनुसार संगीत, वादन, गायन, चित्र, निसर्ग पर्यटन, मनोरंजनाकडे वळवावे.
९) कुटुंबातील प्रत्येकाने सोबत जेवण करावे, पालकांनी पाल्यांशी राेज किमान १ तास संवाद साधावाच.
——————————————-
हेही वाचा –