नवी दिल्ली/नाशिकः पुढारी वृत्तसेवा
राज्यभर गाजत असलेल्या नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. तसेच, लोकप्रतिनिधीच अशा बाबांकडे जात असतील तर हे चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी राज्यातील लोकप्रतिनिधींचे कान टोचले आहेत.
शरद पवार यांनी सोमवारी (दि. ६) राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली, त्यानंतर दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर भूमिका मांडली. खरात प्रकरणासंदर्भात पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर पवार म्हणाले की, मी दोन-तीन ठिकाणी जातो, पंढरपूरला पांडुरंग, तुळजापूरला तुळजाभवानीचे दर्शन घेतो. तसेच, निवडणुकीवेळी कान्हेरी गावात मारुतीचे दर्शन घेतो, पण त्याची जाहिरात करत नाही.
आज राज्यात चिंता वाटावी, अशी परिस्थिती आहे. खरात बाबानंतर आणखी बाबा आला, राज्यात बाबांची गर्दी झाली आहे. एका बाजूला शाहू-फुले-आंबेडकर म्हणायचे आणि दुसरीकडे अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी जातात हे चिंताजनक आहे.
कोणी किती फोन केले? हे माझ्या वाचनात आले, त्यात अनेकांची नावे आहेत, त्यात राजकीय पक्षात स्थान भूषवणारे लोकही आहेत, असे म्हणत शरद पवारांनी नाव न घेता सीडीआरमधून समोर आलेल्या माहितीचा उल्लेख असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.