

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूपूर्वी आणि त्यानंतर समता पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत, असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. सोमवारी त्या येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, ज्या काळात अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा झाल्याचा संशय होता, नेमक्या त्याच काळात समता पतसंस्थेतील व्यवहारांमध्ये वाढ झाली. एक एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या वर्षभराच्या काळात या पतसंस्थेत महिन्याकाठी केवळ २ ते ८ व्यवहार होत होते.
मात्र, अजित पवार यांच्या अपघाताच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २७ जानेवारीला अचानक १७ व्यवहार झाले. तसेच ज्या दिवशी अपघात झाला (२८ जानेवारी), त्या दिवशी १९ व्यवहार झाले आणि त्यानंतरच्या तीन दिवसांतही व्यवहारांचा वेग कायम होता. एका वर्षात जेवढे व्यवहार झाले नाहीत, तेवढे मेसेजेस केवळ २४ ते ४८ तासांत आले.
अपघाताच्या टायमिंगलाच झालेली ही पैशांची संशयास्पद फिरवाफिरवी नक्की कोणासाठी होती आणि याचा सूत्रधार कोण, हे शोधण्यासाठी आपण हा सर्व तपशील एसआयटीकडे सोपविणार आहेत, असेही दमानिया यांनी स्पष्ट केले.
दमानिया यांनी या पत्रकार परिषदेत भोंदू खरात आणि त्याच्याशी संबंधित समता पतसंस्थेचे कनेक्शन थेट अजित पवार यांच्या अपघाताच्या तारखांशी जोडले.
संशय आणखी गडद : रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही दमानिया यांचा संदर्भ देत, पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघाताशी भोंदू खरातचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, अजित पवार यांचा व्हीएसआर कंपनीच्या विमानातून झालेला प्रवास व खरातचे अनुयायी पाहता अजितदादांच्या अपघाताशी त्याचा काही संबंध आहे का, हा संशय अधिक गडद होतो. यासंदर्भात चौकशी करताना सीआयडीने खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचीही कसून चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.