

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका परीक्षा होण्याच्या अवघ्या २४ तासांपूर्वी फुटल्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (१ जुलै) दुपारी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.
पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री भुसे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्यभरातील सुमारे सहा लाखांहून अधिक टीईटी परीक्षर्थीचे शैक्षणिक भविष्य या घटनेमुळे संकटात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. 'राजीनामा द्या' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलन सुमारे दोन तास सुरू होते. आंदोलनाची दखल घेत तहसीलदार विशाल सोनवणे यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
तसेच, शनिवारी (४ जुलै) मंत्री भुसे यांच्यासमवेत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनादरम्यान पेपरफुटी प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र एसआयटीमार्फत चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, रद्द झालेल्या परीक्षेमुळे उमेदवारांनी केलेल्या प्रवास व इतर खर्चाची शासनाने भरपाई करावी, प्रभावित उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत व पात्रतेच्या मुदतीत वाढ द्यावी, तसेच २०२१ पूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी स्वतंत्र क्षमता चाचणी घेण्याची मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिला. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, राज्य कार्यकारिणी सदस्य जितरत्न पटाईत, नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दीपक पवार, युवा जिल्हाध्यक्ष शशी पवार, जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, टीईटी परीक्षार्थी उपस्थित होते.
66 परीक्षा व्यवस्थेत पेपरफुटी ही अपवादात्मक घटना राहिलेली नसून ती सातत्याने घडणारी गंभीर समस्या बनली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी वारंवार खेळ होत असून, सरकारच्या निष्काळजीपणामुळेच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- प्रशांत बोराडे, राज्य प्रवक्ते, सम्यक विद्यार्थी आंदोलन