नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कांद्याला शासनाने जाहीर केलेला १२ रुपये भाव अत्यंत तुटपुंजा असून, तो शेतकऱ्यांना अजिबात परवडणारा नाही. भविष्यात हेच भाव राहिले, तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येईल. नाफेडने कांदा थेट बाजार समित्यांमध्ये खरेदी करावा.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य व समाधानकारक भाव दिला, तर आम्हीही त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा देऊ, असे खळबळजनक आणि महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
आ. पवार यांनी सोमवारी (दि.१८) लासलगाव येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. या दौऱ्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी कांदाप्रश्न, नाफेडमधील भ्रष्टाचार, पेपरफुटी आणि विरोधकांच्या टीकेवर कडाडून हल्ला चढवला. मंत्री नितेश राणे यांच्यावर तोफ डागत पवार म्हणाले, नितेश राणे, बिळाच्या बाहेर या! शेतकरी हिंदू नाहीत का? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान होतो, तेव्हा तुम्ही कोणत्या बिळात लपून बसता? तुमची उंची आम्हाला चांगलीच कळली आहे.
वरिष्ठांकडून आदेश आल्यावर तुम्ही नाचायला लागता. भूमिका, विचार आणि कपडे बदलतात तसे तुम्ही पक्ष बदलता. केवळ नेत्यांना खूश करण्यासाठी हे आमदार विधाने करत असल्याचे ते म्हणाले.
काळी बाहुली, रक्त हे कोणासाठी होते?
पवार यांनी भोंदू खरातच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत, या प्रकरणात केवळ एक-दोन व्यक्तींना टार्गेट केले गेले आहे. खरातचा पोलिसांत एन्काउंटर होऊ शकतो किंवा त्याला मारले जाऊ शकते. काळी बाहुली, रक्त हे कोणासाठी केले होते? आमचा या अंधश्रद्धेवर विश्वास नाही, पण याचा शोध लागला पाहिजे. यात सामान्य लोकांचे व्हिडिओ बाहेर आणले गेले आणि मोठ्या धेंडांचे व्हिडिओ कपाटात लपवून ठेवले आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. अजित पवार शेतकऱ्यांसाठी नेहमी अग्रेसर असायचे. पण, आता त्यांचा वेगळा पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षाबद्दल मी यापुढे जास्त बोलणार नाही, असे सांगत त्यांनी भाष्य करणे टाळले.