

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध नाशिक जिल्हा न्यायालयात दाखल मानहानीचा दावा न्यायालयाने निकाली काढला असून, या प्रकरणाची संपूर्ण कार्यवाही समाप्त झाल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे व नाशिक शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली.
या प्रकरणामध्ये सुरुवातीला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने प्रक्रिया (इश्यू प्रोसेस) काढण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाविरुद्ध राहुल गांधी यांच्या वकिलांकडून फौजदारी पुनरावलोकन अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता.
सत्र न्यायालयाने या पुनरावलोकन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर पुनरावलोकन अर्ज अंशतः मंजूर करीत प्रक्रिया करण्याचा आदेश रद्द केला. तसेच न्यायदंडाधिकारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयास मूळ फौजदारी अर्जामध्ये प्रक्रिया करण्याबाबत नव्याने विचार करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नव्याने सुरू केलेल्या कारवाईत सरकारवाडा पोलिस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २०२ अन्वये अहवाल न्यायालयासमोर ठेवला. मात्र, यात तक्रारदाराने स्वतःहून तक्रार मागे घेतली. त्यानुसार जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडिया यांनी हे प्रकरण तक्रारदाराने मागे घेतल्यामुळे निकाली काढल्यात येत असल्याचे जाहीर केले.
हे प्रकरण २ मार्च २०२६ रोजीच न्यायालयाने पूर्णपणे बंद केल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात राहुल गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे, अॅड. गजेंद्र सानप, अॅड. अविनाश गाढे, अॅड. सिद्धार्थ जाधव, अॅड. हुजेफा सय्यद, अॅड. सानिका ठाकरे यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अणि सत्र न्यायालयात बाजू मांडली.