

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरीत मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन कुटुंबातील ९ जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, शहरातील उघड्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उघड्या, धोकेदायक विहिरी आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. शहरातील वडाळा रोड परिसरात जेएमसीटी शाळेजवळ, खोत डेअरीसमोर रस्त्यालगतच मोठी विहीर आहे. तिला कोणतेही संरक्षण कुंपण नाही.
हा रस्ता वर्दळीचा असून जवळच शैक्षणिक संकूल असल्याने दररोज हजारो विद्यार्थी येथे ये-जा करतात. हा मार्ग रुग्णालय आणि डीजीपी नगरकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने वाहनांची सतत वर्दळ असते.
या उघड्या विहिरीमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या तक्रारीनुसार, रात्री रस्ता आणि विहीर यातील फरक ओळखणे कठीण होत असल्याने धोका वाढतो. अशोका मार्ग परिसर तसेच 'आठवण हॉटेल'च्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावरही अर्धवट कुंपण असलेली विहीर आहे.
येथे यापूर्वी २ ते ३ अपघात घडलेले आहे. खोडेनगर, वडाळा गाव भागातही अनेक उघड्या विहिरी रस्त्यालगत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, जिल्ह्यातील सर्व धोकादायक विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करत त्या सुरक्षित कराव्यात. वेळेत ठोस पावले उचलली नाहीत तर आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नांदूर नाक्यावर विहिरीमुळे अपघाताचा धोका
नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नांदूर नाक्याच्या पश्चिमबाजूस फक्त १०० मीटरवर पुरातन बारव आहे. महामार्गापासून फक्त १० ते १५ फुटांवरच ही बारव आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी महामार्गाला वळण आहे. जर रात्रीच्या वेळेस वळण समजले नाही तर एखादे वाहन सरळ या पुरातन मोठ्या बारवेत कोसळू शकते. बारव व महामार्गात दुसरा कोणताही अडथळा नसल्याने अपघाताची शक्यता अधिक आहे.
वडाळा परिसरातील या उघड्या विहिरींकडे दुर्लक्ष करणे दुर्दैवी आहे. तातडीने कुंपण घालावे किंवा विहिरी बुजवाव्यात
तन्वीर सय्यद, वाहनचालक.