

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा बाजारात उतरविण्यास सुरुवात केली असली, तरी कांदा भाव खात असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने गेल्या दहा दिवसांत १७ शहरांमध्ये सुमारे ४ हजार टन बफर कांद्याची विक्री केली आहे. 'नाफेड' आणि 'एनसीसीएफ'च्या माध्यमातून हा कांदा ग्राहकांना ३५ रु. किलो दराने उपलब्ध करून दिला जात आहे.
तरीही दरवाढीला अपेक्षित ब्रेक लागला नसल्याचे चित्र आहे.
केंद्राकडे २०२६ साठी सुमारे १.२१ लाख टन कांद्याचा बफर साठा आहे. वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादक राज्यांमधून हा कांदा प्रमुख ग्राहक बाजारपेठांमध्ये ट्रक तसेच 'कांदा एक्स्प्रेस'च्या माध्यमातून पाठविला जात आहे.
मात्र, सरकारी हस्तक्षेपाचा बाजारभावावर अपेक्षित परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. २८ ऑगस्ट रोजी हस्तक्षेप सुरू झाला, त्यावेळी देशातील सरासरी किरकोळ कांदा दर सुमारे ४८.५० रु. किलो होता. दहा दिवसांनंतर तो ५०.७९ रु. किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे हजारो टन बफर कांदा बाजारात उतरवूनही किरकोळ दरवाढ थांबलेली नाही.
राज्यातील प्रमुख कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्येही कांद्याच्या दरात पुन्हा तेजी दिसून आली. अलीकडेच लासलगाव बाजारातील कांद्याचा सरासरी दर ४५५१ रुपये प्रतिक्विंटल आहे. सरकारी हस्तक्षेप, बफर स्टॉकची विक्री आणि साठेबाजीविरोधातील उपाययोजना करूनही बाजारातील अस्थिरता कायम आहे.
बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणून ग्राहकांना दिलासा देण्याचे धोरण सरकार राबवत असले, तरी उत्पादक कांद्याच्या बाजारभावावर त्याचा परिणाम किती आणि कसा होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दर वाढले की ग्राहकांच्या हितासाठी सरकारी हस्तक्षेप आणि दर घसरले की शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार मोकळा, अशा धोरणाऐवजी कांद्याच्या बाजारासाठी दीर्घकालीन आणि स्थिर निर्यात-विपणन धोरणाची गरज असल्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
लासलगावमध्येही दरातील चढ-उतार कायम आहेत. गेल्या काही दिवसांत बाजारातील कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे वृत्त आहे. कमी आवक, हवामानातील अनिश्चितता आणि उत्पादनातील घट यामुळे बाजारातील पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
यापूर्वी सरकारी बफर कांदा दिल्लीकडे पाठविण्यासाठी लासलगाहून 'कांदा एक्स्प्रेस' रवाना करण्यात आली. मात्र, या कांद्याच्या गुणवत्तेवरून शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित करत रेल्वे रोखल्याची घटनाही घडली आहे.