

येवला : महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात वडगाव बल्हे येथील शेतकरी कुटुंबाने वहिवाटीच्या रस्त्याच्या वादातून तहसील कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तालुक्यातील वडगाव बल्हे शिवारातील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या वापराबाबत तहसीलदार कार्यालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणाचा निकाल २९ एप्रिल २०२५ ला अर्जदारांच्या बाजूने लागून रस्ता अडथळामुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, संबंधित प्रकरणात काही प्रतिवादींचा समावेश न झाल्याने प्रत्यक्षात रस्ता खुला करण्याच्या कार्यवाहीत अडचणी निर्माण होत होत्या. याविरोधात अपीलही दाखल करण्यात आले होते. दरम्यान, ३० एप्रिलला मंडळ अधिकाऱ्यांनी रस्ता खुला करण्याबाबत नोटीस काढली. मात्र, काही अर्जदारांनी ती स्वीकारण्यास नकार दिला.
या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असताना नवनाथ जाधव, प्रशांत जाधव, देवीदास जाधव, किरण जाधव, जया जाधव, मनीषा जाधव व कमल जाधव (सर्व रा. वडगाव बल्हे) यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संबंधितांकडील डिझेल कॅन जप्त करत त्यांना ताब्यात घेतले