

नाशिक : भूसंपादन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित ६६ किलोमीटरच्या बाह्य परिक्रमा मार्गाचे (रिंग रोड) प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. मातोरी आणि मुंगसरे भागात जमिनीच्या मोजणीदरम्यान शेतकरी महिलांना झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. शेतकऱ्यांना रस्त्यावर उघडं पाडून प्रशासन कुंभमेळा साजरा करणार का, असा रोखठोक सवाल महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार हिरामण खोसकर यांनीच उपस्थित केला आहे.
या प्रकरणी आ. खोसकर यांनी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांकडे याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. प्रांताधिकाऱ्यांनी हुकूमशाही न करता आधी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना योग्य मोबदला द्यायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आमदार खोसकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आ. खोसकर यांनीच आक्रमक पवित्रा घेत हुकूमशाही शब्दांत प्रशासनाचा निषेध केला. मोजणीदरम्यान अधिकारी आणि पोलिसांनी घरात घुसून शेतकऱ्यांना केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आ. खोसकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले की, बळाचा वापर करून शेतकऱ्यांवर लाठीमार करणे हा निव्वळ अन्याय आहे. एका वृद्ध महिलेला ज्या अमानुषपणे मारले गेले, ते पाहून डोळ्यात पाणी येते. अशी मारझोड करून प्रशासन काय साध्य करणार? असा संतप्त सवाल खोसकर यांनी उपस्थित केला.
जर रिंग रोड करायचा होता, तर ५-१० वर्षांपूर्वीच शेतकऱ्यांना कल्पना द्यायला हवी होती. तसे झाले असते, तर शेतकऱ्यांनी तिथे घरे बांधली नसती. आता अचानक कारवाई करून शासन शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहे. आम्ही सत्तेत आलो म्हणजे काय शेतकऱ्यांना मारून टाकायचे का? या शब्दांत आ. खोसकर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कुंभमेळ्याची कामे व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.