

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मागील काही दिवसांपासून नाशिकचे तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने नाशिककर उकाड्याने हैराण झाले आहेत. मात्र, शनिवारी (दि.१८) दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने, हवमानात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला तीन दिवसांचा 'यलो अलर्ट' दिला असून, काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.
थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचे तापमान एप्रिलच्या मध्यातच ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले. त्यामुळे नाशिककरांना मागील काही दिवसांपासून उकाड्याचा सामना करावा लागत आहे. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही मोठी वाढ झाल्याने, दिवसासह रात्रीदेखील उकाडा जाणवत असल्याचा अनुभव नाशिककर मागील काही दिवसांपासून घेत आहे.
दरम्यान, शनिवारी (दि.१८) वातावरणात अचानक बदल झाल्याचे दिसून आले. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने उष्णतेची फारशी धग जाणवली नाही. मात्र, वातावरणात उकाडा असल्याने, घामाने नाशिककर त्रस्त झाले. दरम्यान, हवामान विभागाने नाशिकला तीन दिवसांचा यलो अलर्ट दिल्याने, पुन्हा एकदा नाशिकवर अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे.
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, १८, २० व २१ एप्रिल रोजी नाशिकसह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. याशिवाय सोसाट्याचा वाराही वाहणार आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळीसह गारपीट झाल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. अशात पुन्हा अवकाळी बरसल्यास, शेतपिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
कमाल तापमानात वाढ
ढगाळ वातावरण असले तरी, कमाल तापमानात शनिवारी वाढ नोंदविली गेली. कमाल तापमान ३९.१ तर किमान तापमान २२.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. मागील दोन दिवसांत किमान आणि कमाल तापमानात किंचित घसरण झाली होती. मात्र, शनिवारी त्यात पुन्हा एकदा वाढ नोंदविली गेली आहे.