

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विवाह म्हटला म्हणजे त्यातील बडेजावपणा हौसेला मर्यादा राहत नाही. महागाईच्या जमान्यातही विवाह सोहळ्यावर लाखो रुपये खर्च होत असतात. मात्र, त्या बडेजावपणाला फाटा देत १ जानेवारी ते १९ मे या कालावधीत जिल्ह्यात एकूण ७१६ विवाह नोंदणी पद्धतीने झाले. त्यापैकी २९१ जोडप्यांनी फॉर्म -१६द्वारे विवाह झाल्याची नोंद केली आहे. ४२५ स्पेशल विवाहांची नोंद विवाह नोंदणी कार्यालयात झाली आहे.
विवाह सोहळा म्हणजे जणू काय प्रतिष्ठेची स्पर्धाच असते, विवाहाचे ठिकाण, बॅण्ड, डेकोरेशन, भोजन व्यवस्था आणि इतर खर्चिक परंपरांवर भर दिला जातो. घरचा पैसा नसला, तरी वेळप्रसंगी कर्ज काढून सोहळा पार पाडला जातो. असे चित्र असताना आजच्या युवक-युवतींमध्ये काहीसा समजूतदारपणा वाढल्याचे चित्र आहे.
जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाचा आकड्यांवरून कायदेशीर वैधतेसाठी विवाह नोंदणी केली जात असल्याने नोंदणी कार्यालयांत गर्दी वाढू लागली आहे. विशेष विवाह अधिनियम तसेच हिंदू विवाह अधिनियमांतर्गत विवाह नोंदणीची प्रक्रिया आता तुलनेने सोपी आणि जलद झाल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे.
ऑनलाइन प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची सुलभता आणि कमी खर्च या कारणांमुळे विवाह नोंदणी अधिक लोकप्रिय होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सामाजिक बदल, आर्थिक बचत आणि कायदेशीर सुरक्षितता या तिन्ही कारणांमुळे पुढील काळातही विवाह नोंदणीचा कल अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पारंपरिक विवाहानंतरही कायदेशीर नोंदणी
पारंपरिक विवाह झाल्यावर नोंदणी करण्याचे तसदी कोणीही घेत नाही. मात्र, सध्या कायदेशीर बाब म्हणून आणि विवाह नोंदणीबाबत शासनाकडून वेळोवेळी होणाऱ्या जनजागृतीचा परिणाम म्हणून आता पांरपारिक विवाह झाल्यानंतरही अनेकजण प्राधान्य विवाह नोंदणी करून घेतानाचे चित्र आहे. मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक कागदपत्रापैकी एक झाल्याने प्राधान्याने विवाहानंतर नोंदणी केली जात आहे