

ठळक मुद्दे
महापालिका प्रशासन ५४ एकरवरील १ हजार ८२५ वृक्ष तोडण्याच्या तयारीत
नाशिकचा जळगाव होऊ देणार नाहीत
उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
पंचवटी (नाशिक) : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राममध्ये साधू- महंतांना सुविधा देण्यासाठी महापालिका प्रशासन ५४ एकरवरील १ हजार ८२५ वृक्ष तोडण्याच्या तयारी आहे. या निर्णयाला सुरूवातीपासून पर्यावरणप्रेमीकडून तीव्र विरोध होत आहे. याप्रकरणी मनपाकडे दाखल हरकतीवर सोमवारी (दि. २४) सुनावणी घेण्यात आली. यावेळी पर्यावरण प्रेमींनी आक्रमक पवित्रा घेत साधुग्राममधील एकही झाड तोडू देणार नसल्याचा सांगत नाशिकचे जळगाव करू नका असे सांगत अप्रत्यक्षपणे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना इशाराच दिला तसेच महापालिकेच्या या निर्णयाविरोधात थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची भूमिका पर्यावरणप्रेमींनी मांडली.
साधुग्राममधील प्रस्तावित वृक्षतोडीसंदर्भात पंचवटीतील पलुस्कर सभागृहात सोमवारी उद्यान अधिक्षक विवेक भदाणे, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरीशचंद्र, उपअभियंता समीर रकटे, नितीन राजपूत यांच्या प्रमुख उपस्थित सुनावणी झाली. महापालिकेकडून सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. अंदाज वर्तवल्याप्रमाणेच तीव्र विरोधामुळे ही सुनावणी चांगलीच वादळी ठरली. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून पलुस्कर सभाग्रहात व बाहेर पोलिसांसह सुरक्ष रक्षकांचा चोख बंदोब्स्थ ठेवण्यात आला होता. यावेळी उपस्थित पर्यावरणप्रेमी प्रारंभीपासून आकमक झालेले दिसून आले. साधुग्राममधील वृक्षतोड भूमाफीयांसाठी व बांधकाम व्यावसायिकांसाठी सुरु असल्याचे गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. साधु- महंतांसाठी जी झाडे तोडली जाणार आहेत. त्यासाठी त्यांची तरी इच्छा आहे का? आजवर एवढे सिंहस्थ झाले. त्यावेळी कधीही झाडे तोडली नाहीत. मग आताच कशासाठी अठारशे खून करण्याचे पातक करण्याचा प्रयत्न होत आहे.
एखाद्या सामान्य माणसाने झाड तोडले तर त्यांच्यावन मणुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो. येथे तर तुम्ही अठराशे खून करत आहात. तपोवनमधील एकही झाड तोडता कामा नये, साधुग्रामचा आटटाहास कशासाठी केला जात आहे. तेथील झाडांमुळे जैवविविधता जोपासली जात आहे. महापालिकेने हुकुमशाही पद्धतीने झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, तो आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला. वृक्षतोड करणे कायद्याने गुन्हा असून महापालिका मनमानीप्रमाणे वागू शकत नाही अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी एकमुखीने यावेळी घेतली. सुनावणीवेळी माजी नगरसेवक राजेद्र बागुल, राजू देसले, निरंजन टकले, संदीप भानोसे, देवांग जानी, निशीकांत पगारे, रोहन देशपांडे आदींसह पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
गोंधळ अन् सुनावणी थांबविण्याचा इशारा
सुनावणी सुरु झाल्यानंतर उद्यान उद्यान अधिक्षक विवेक भदाणे हे उपस्थितांसमोर बोलू लागाताच त्यावर माजी नगरसेवक राजेद्र बागुल यांनी सुनावणीसाठी सक्षम अधिकारी येथे कोणीही नाही. जे आहेत ते प्रभारी असून आयुक्तांनी स्वत: येथे हव्या होत्या अशी मागणी केली. यावरुन पर्यावरणप्रेमींकडून गोंधळ घातला जाऊ लागला. शांत होण्याचे आवाहन करुनही प्रतिसाद दिला जात नसल्याचे पाहून उद्यान अधिक्षक विवेक भदाणे यांनी जर गोंधळ सुरुच राहिल्यास सुनावणी रद्द केल्याचे जाहीर करु असे म्हणताच पर्यावरणप्रेमी नरमले.
सुनावणी सोडून आयुक्त बक्षीस समारंभाला
वृक्षतोडप्रकरणी महत्वाची सुनावणी असताना आयुक्त मनीषा खत्री यांनी या सुनावणीकडे पाठ फिरविली. त्यातच त्या दुसरीकडे एका बक्षीस समारंभाला गेल्याचे त्यांनी इन्स्टाग्रामवर टाकलेल्या फोटोंमुळे उपस्थितांमधून नाराजीचा सूर दिसून आला. त्यातच एका पर्यावरण प्रेमीने आयुक्तांना वृक्षाबाबत काहीच घेणे-देणे नसल्याचे म्हटले.
सोमवारच्या सुनावणीमध्ये किती हरकती आल्या आणि सुनावणीत काय झाले. याबाबतची माहिती आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमोर सादर केल्या जातील.
विवेक भदाणे, उद्यान अधिक्षक, मनपा
सुनावणीस्थळी ठाकरें सेनेचे पदाधिकारीही
या सुनावणीसाठी पर्यावरणप्रेमींसह ठाकरे सेनेचे काही पदाधिकारीही उपस्थित होते. महानगरप्रमुख प्रथमेश गिते सुनावणी सुरु झाल्यावर आले असता काहीवेळाने इतर पदाधिकाऱ्यासह सभाग्रहातून निघून गेले. मात्र, भाजप, शिंदेसेना पक्षातील कोणीही राजकीय पदाधिकारी सुनावणीस्थळी दिसून आले नाही.