

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
तीन दिवसांपासून शहरातील बहुतांश एलपीजी गॅसपंप कोरडे पडल्याने रिक्षाचालकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. इंधनाअभावी हजारो रिक्षा रस्त्यावर धावत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, संघटनांकडून येत्या ८ एप्रिलला आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, सर्व रिक्षाचालक रस्त्यावर उतरणार आहेत. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम स्थानिक पातळीवर तीव्रतेने जाणवत असताना प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बसल्याची संतप्त प्रतिक्रिया चालकांमधून व्यक्त होत आहे.
शहरातील बहुतांश पंपांवर एलपीजी गॅस उपलब्ध नसल्याने चालकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. गेल्या महिनाभरात एलपीजीच्या दरात तब्बल सात वेळा वाढ होऊन दर ५२ रुपयांवरून थेट ९० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. काही ठिकाणी १०० रुपयांपर्यंत दर आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
मात्र भाडेदरात कोणतीही वाढ नसल्याने रिक्षाचालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच आता गॅसच उपलब्ध नसल्याने उत्पन्न घटले आणि खर्च वाढला, अशा दुहेरी संकटात चालक सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर रिक्षाचालक संघटनांनी शासनावर तीव्र टीका करत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
गॅस कंपन्यांच्या मनमानी दरांवर नियंत्रण आणावे, नियमित पुरवठा सुरू करावा कंपन्यांच्या स्पर्धेमुळे वाढलेला ताण कमी करावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे. एकूणच, गॅसटंचाई आणि दरवाढीच्या दुहेरी फटक्यामुळे नाशिकमधील रिक्षाचालक हवालदिल झाले असून, शासनाच्या निष्क्रियतेमुळे सामान्य कष्टकरी वर्गाचे जगणे असह्य होत असल्याची तीव्र भावना व्यक्त
एलपीजी गॅसटंचाईमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने तत्काळ उपाययोजना न केल्यास ८ एप्रिल रोजी संपूर्ण शहरातील रिक्षाचालक मोठे आंदोलन छेडतील.
- किशोर खडताळे,अध्यक्ष, नाशिकरोड रिक्षाचालक- मालक युनियन
तीन दिवसांपासून गॅस मिळत नसल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने जी दरवाढ केली आहे ती अतिशय चुकीची आहे. त्यामुळे खिशाला झळ पोहोचत असून, नाशिकहून निफाड येथे जाऊन गॅस भरावा लागत आहे. त्यातही १०० रुपये दर आकारले जात आहे. यावर पुरवठा विभागाने लक्ष द्यावे.
- दीपक शेवाळे, आरटीओ आदर्श रिक्षाचालक पुरस्कारार्थी