![beed](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F02%2Fimages-1-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक (ओझर): पुढारी वृत्तसेवा
प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आणि आमच सेम असत या मंगेश पाडगावकर यांच्या कविते प्रमाणेच त्या दोघांचे देखील प्रेमाचे सुत जुळले अस म्हणतात..प्रेमाला वयाचे बंधन नसते याच उक्तीनुसार तो अठ्ठावीस वर्षाचा आणि मात्र ती अल्पवयीन…आपल्या प्रेमाची कुणकुण त्या दोघांच्या घरी लागली दोन्ही परिवार निरक्षर असल्याने कोणतेही आढेवेढे न घेता दोन्ही परिवारांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली. मात्र एका चाणाक्ष व्यक्तीने या लग्नाची गोपनीय माहीती बालविवाह प्रतिबंधक विभागाला कळवली आणि वराच्या गळ्यात वरमाला पडण्याअगोदरच त्याला ओझर पोलीसांनी ताब्यात घेतले आणि हा बालविवाह रोखत दोघांना समज देत सोडुन दिले.
ओझर येथील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी आई वडीलांसोबत कांदा चाळीवर मोलमोजुरी करत होती. याच चाळीवर चांदोरीतील अठ्ठावीस वर्षाचा तरूण देखील कामाला होता. चार महिण्यापुर्वी दोघांची एकमेकांशी ओळख झाली. काही दिवसांतच या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोन्ही परिवाराने या लग्नाला संमती दिली. दोन्ही परिवार निरक्षर असल्याने त्यांना कायद्याची कोणतीही माहिती नव्हती. मंगळवारी (दि. ३०) चांदोरीतील खंडेराव मंदिरात हा विवाह आयोजित करण्यात आला होता.
एका चाणाक्ष व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती बालविवाह प्रतिबंधक विभागाला कळवताच संबंधित विभागाने तातडीन चक्रे फिरवले. ओझरचे सहा. पोलिस निरीक्षक तुषार गरूड, पोलीस उपनिरीक्षक युगंधरा केंद्रे पो. ना. पांडुरंग पाटील यांच्या पथकाने विवाहासाठी निघालेली वधु, तिचे पालक व अन्य नातलगांना येथील छत्रपती चौकात सायखेडा फाट्यावरील उड्डाणपूलाजवळ गाठत पोलीस ठाण्यात आणले. चांदोरी येथुन वर व त्याच्या नातलगांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. दोन्ही परिवारांना कायदेशीर बाबी पोलिसांनी समजावुन सांगितल्या. दोन्ही परिवारांनी पोलिसांचे म्हणणे मान्य करत विवाह रद्द केला.