

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेकडून यंदा मे महिन्याचे तीन आठवडे उलटूनही पावसाळापूर्व कामांना सुरुवात झालेली नसतानाच आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचाही अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी महापालिकेने शहरातील ३१ प्रभागांत प्रभागनिहाय आपत्कालीन पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयुक्त मनीषा खत्री यांनी यासंदर्भात निर्देश दिले असून, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, घनकचरा, उद्यान, अतिक्रमण आणि मलनिस्सारण विभागांतील १५ ते २० कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक प्रत्येक प्रभागात कार्यरत राहणार आहे.
या पथकांना जेसीबीसह आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार असून, पाण्याचे ब्लॅक स्पॉट हटविणे, नैसर्गिक नाले, चेंबर्स आणि पावसाळी खुल्या गटारांची साफसफाई करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत शहरातील नैसर्गिक नाले, पावसाळी गटारे आणि चेंबर्सची साफसफाई विभागनिहाय ठेकेदारांमार्फत केली जाते. मात्र यंदा अद्याप प्रभागनिहाय ठेकेदार निश्चित करण्यात आलेले नाहीत. त्यातच विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे कामांना मंजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेने या कामांना आचारसंहितेतून सूट देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असली, तरी अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन युद्धपातळीवर कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. नैसर्गिक नाले साफसफाई, पावसाळी आरसीसी पाइप गटारांची स्वच्छता, खुल्या गटारांची साफसफाई तसेच चेंबर्सची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दहा दिवसांत काम पूर्ण करण्याचे निर्देश
आपत्कालीन पथकांची नियुक्ती झाल्यानंतर संबंधित प्रभागातील पावसाळापूर्व कामे १० दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरामध्ये पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना दरवर्षी घडतात.
यंदा विविध विकासकामांसाठी रस्त्यांची खोदाई सुरू असल्यामुळे ब्लॅक स्पॉटची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणानुसार शहरात पाणी साचणारे २११ क्रॉनिक ब्लॅक स्पॉट ओळखण्यात आले आहेत. या ठिकाणी पावसाचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जबाबदारीही या पथकांवर सोपविण्यात आली आहे