

नाशिकः पुढारी वृत्तसेवा
राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला अत्यंत संथ गतीने सुरुवात झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशीही सव्र्व्हर डाउनची समस्या कायम राहिल्याने नोंदणी, अर्ज भरणे आणि पर्याय निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.
तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज पूर्ण होत नसल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अनेक अडथळे येत असल्याची तक्रार विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे. वेबसाइटवरील संथ गती, लॉगिनमध्ये अडचणी, अर्ज दाखल न होणे तसेच आवश्यक माहिती अपलोड करताना येणाऱ्या तांत्रिक त्रुटींमुळे प्रक्रिया अधिकच रखडली आहे.
अनेक विद्यार्थ्यांना सायबर कॅफे किंवा महाविद्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची मुदत २५ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी सर्व्हरची समस्या तातडीने दूर करून प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.