

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीचे कारण ठरले असताना, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठा कायम ठेवत शिवसेना शिंदे गटाच्या कथित प्रयत्नांना नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही खासदारांना पक्षांतरासाठी कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्याचा आरोप केल्यानंतर या चर्चेला अधिकच वेग आला आहे. ठाकरे गटाच्या महाराष्ट्रातील नऊ खासदारांपैकी सहा खासदार फुटले असून, त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करीत शिंदे गटात विलीनीकरणाची तयारी केली आहे. खा. राजाभाऊ वाजे यांनी मात्र आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
बुधवारी (दि. 17) नवी दिल्ली येथे खा. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहन त्यांनी दरम्यान, राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी या संपूर्ण घडामोडींवर मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दि. १४ एप्रिल रोजी ठाणे आणि देहू येथील दोन पदाधिकारी सिन्नरमधील त्यांच्या निवासस्थानी आले होते. त्यांनी सुमारे दोन ते अडीच तास चर्चा करून राजाभाऊ वाजे यांनी शिंदे गटात प्रवेश करावा, यासाठी मनधरणी केली होती. त्यावेळी मोठा विकास निधी, मतदारसंघासाठी विशेष मदत आणि भविष्यातील राजकीय पाठबळ देण्याची तयारी दर्शविण्यात आली.
ठाकरे गटात काहीही उरले नाही...
प्रकाश वाजे यांच्या म्हणण्यानुसार, चर्चेदरम्यान 'ठाकरे गटात काहीही उरलेले नाही, अनेक आमदार-खासदार गेले आहेत, तुम्हीही आमच्यासोबत या' असा आग्रह धरण्यात आला होता. मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते.
३० कोटी रुपयांपासून ते १०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या ऑफर्सची चर्चा झाली असली, तरी प्रत्यक्षात थेट पैशांची ऑफर नव्हती; मात्र 'विकास निधी' आणि राजकीय मान - सन्मानाचे आश्वासन देण्यात आल्याचे प्रकाश वाजे यांनी स्पष्ट केले. चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधल्याचाही दावा करण्यात येत आहे.
ठाकरे असेपर्यंत शिवसेनेतच राहणार...
प्रकाश वाजे यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही स्पष्ट करीत, 'राजाभाऊंना पैशांची गरज नाही. आमच्याकडे शेती, घरे आणि पुरेशी मालमत्ता आहे. त्यामुळे पैशांच्या किंवा अन्य प्रलोभनांच्या आधारे आम्ही निर्णय घेणारे नाही,' असे ठामपणे सांगितले. तसेच, 'आमचे ठाकरे यांच्याशी राजकीय संबंध आहेत, तर शरद पवार यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत.
मात्र निष्ठा बदलण्याचा प्रश्नच येत नाही,' असेही त्यांनी नमूद केले. राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनेत प्रवेश करताना, उद्धव ठाकरे यांनी विचारलेल्या 'किती दिवस शिवसेनेत राहणार?' या प्रश्नाला "तुम्ही आणि मी असेपर्यंत शिवसेनेत राहणार," असे उत्तर दिल्याची आठवणही प्रकाश वाजे यांनी करून दिली. त्यामुळे आजही वाजे कुटुंब ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचा संदेश नांनी दिला