

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजप, शिवसेनेत रस्सीखेच सुरू असतानाच भाजपच्या गणेश गिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत दावा केल्याने महायुतीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून गिते यांचा हा पहिलाच अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे शिंदेसेनेत मात्र धडधड वाढली आहे.
दरम्यान, शिंदेसेनेकडून उपनेते विजय करंजकर तर उबाठाकडून माजी आमदार अनिल कदम यांनीही अर्ज खरेदी केल्याने या निवडणुकीसाठी दोन इच्छुकांची भर पडली आहे. विधान परिषदेच्या जागावाटपा वरून महायुतीत संघर्षाची स्थिती आहे.
नाशिकची जागा शिंदे गटाकडे असताना सर्वाधिक मतदारसंख्येचा दावा करत भाजपने दावा केल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी प्रचारालाही सुरुवात केली असताना, शनिवारी (दि. ३०) भाजपतर्फे गणेश गिते यांनी अर्ज दाखल करत या जागेसाठी भाजप आग्रही असल्याचे स्पष्ट केले.
गितेंच्या अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म नसला, तरी भाजपच्या ९ नगरसेवकांनी सूचक म्हणून स्वाक्षऱ्या करत गिते यांच्या उमेदवारीला थेट पाठिंबा दर्शविला आहे. पक्ष जो निर्णय महारा निवड घेईल तो मान्य राहील असे गितेंनी अर्ज भरल्यानंतर स्पष्ट केले.
पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारीचा शब्द मिळाल्याने त्यांनी भाजपकडूनच अर्ज भरल्याचे सांगितले. सध्या पक्षबदलाची कोणताही विचार नसून अन्य पक्षात जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान भाजपकडून शनिवारी बापू पिंगळे आणि अनिकेत पाटील यांनीही अर्ज घेतले, तर गणेश गितेंचे बंधू गोकुळ गिते यांनीही अपक्ष अर्ज नेला आहे.
नीलेश बोरांचे 'वेट अॅण्ड वॉच'
गणेश गितेंसह नीलेश बोरा हेदेखील भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. परंतु, शनिवारी गितेंचा अर्ज दाखल होत असताना बोरांची अनुपस्थिती चर्चेचा विषय झाली होती. त्यावर जागा भाजपला सुटल्यास दोघांमध्ये ठरवून कोणी निवडणूक लढवायची हे ठरेल, असे गिते यांनी सांगितले. बोरा यांनी मात्र 'वेट अॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे
करंजकर, कदमही रिंगणात
उमेदवारी अर्ज दाखल करण्यात गणेश गितेंच्या रूपाने भाजपने आगळीक साधल्यानंतर शिंदे गटाकडूनही दबावतंत्र सुरू झाले आहे. शिंदे गटाकडून दराडे यांनी प्रचार सुरू करत आपणच महायुतीचे उमेदवार असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, तर शिंदे गटाकडून उपनेते विजय करंजकर यांनी अर्ज घेत आपणही स्पर्धेत असल्याचे स्पष्ट केले आहे. उबाठाकडून शुक्रवारी वसंत गितेंनी अर्ज घेतला असतानाच, शनिवारी माजी आमदार अनिल कदम यांनीही अर्ज घेतल्याने कदमही रिंगणात आले आहेत.