![पेठ : काेटंबी घाटात पलटी झालेली लक्झरी बस.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F01%2F%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A0.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक (पेठ) : पुढारी वृत्तसेवा
गुजरातमध्ये तीर्थाटनासाठी निघालेल्या पश्चिम बंगालमधील यात्रेकरुंच्या लक्झरी बसला काेटंबी घाटात अपघात झाला. त्यात २८ प्रवासी जखमी झालेत. रविवारी (दि.२१) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील भाविक ब्रुज्येश्वरी ट्रॅव्हलच्या बसमधून (डब्ल्यूबी १९, एच ५७१५) तीर्थाटनासाठी निघाले होते. बसमध्ये साधारण ५८ भाविक, चालक व इतर कर्मचारी असे ६३ प्रवासी होते. नाशिकहून ते गुजरातकडे रवाना झालेली ही बस कोटंबी घाटातील डेथ पॉईंटवर अचानक पलटी झाली. चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने ती वेगात पलटी हाेऊन रस्त्यावर आडवी झाली. प्रवाशांचा आक्रोश ऐकून कोटंबी ग्रामस्थ व पेठ येथून आलेल्या नागरिकांनी तिकडे धाव घेतली. तत्काळ बचावकार्य सुरू झाले. पाच रुग्णवाहिकांमधून जखमींना प्रथम पेठ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना तत्काळ नाशिकला रवाना करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पेठ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.