

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
व्याजाच्या पैशांवरून वाद होऊन एका वकिलाला मारहाण करून जबरदस्तीने कारमध्ये बसवून धमकावल्याची घटना सीबीएस परिसरात घडली आहे. या प्रकरणी संशयित रक्षिता कुलकर्णी, तिचे वडील संजय कुलकर्णी आणि आई गौतमी कुलकर्णी यांच्याविरुद्ध मारहाण व अपहरणाचा गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी चार्वाक उत्तम कांबळे (३५, व्यवसाय वकील, रा. म्हसरूळ, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कांबळे यांनी त्यांची मैत्रीण रक्षिता कुलकर्णी हिच्याकडून न्यायालयीन कामकाजासाठी साडेपंधरा लाख रुपये घेतले होते. मात्र, संबंधित काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी ती रक्कम परत केली, परंतु कांबळे यांनी उशिरा पैसे दिल्याने संशयितांनी व्याजापोटी ४४ हजार रुपये देण्याची मागणी केली.
तक्रारीनुसार रक्षिता कुलकर्णी, तिचे वडील संजय कुलकर्णी आणि आई गौतमी कुलकर्णी यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला वारंवार फोन करून व्याजासह पैसे देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, १४ मार्च रोजी सकाळी दहाच्यासुमारास सीबीएस परिसरातील अंजली झेरॉक्स दुकानासमोर फिर्यादीला बोलावण्यात आले. तेथे संशयितांनी शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी संजय कुलकर्णी यांनी लोखंडी रॉडने कांबळे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर संशयितांनी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून सार्वजनिक वाचनालयाच्या दिशेने नेले. दरम्यान, कारमध्ये असताना रक्षिता कुलकर्णी हिने सीटबेल्टने गळा आवळण्याचा प्रयत्न करत पैसे न दिल्यास आणखी मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. सदर घटनेचा तपास सरकारवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हिरामण भोये करीत आहेत.
असे आहे प्रकरण
अॅड. चार्वाक कांबळे व रक्षिता कुलकर्णी यांची जुनी ओळख आहे. दोघेही व्यवसायाने वकील आहेत. जमिनीच्या लेटीकेशन प्रकरणात कुलकर्णी यांच्याकडून कांबळे हे वकील होते. या प्रकरणांमध्ये कुलकर्णी यांनी २० लाख रुपये अॅड. कांबळे यांना फी स्वरूपात दिले. मात्र, सदर प्रकरणातील लेटीकेशन सुटू शकले नाही.
त्यामुळे सदर पैसे कांबळे यांनी दोन टप्प्यांत एकदा पाच व दुसऱ्यांदा १५ लाख असे कुलकर्णी यांच्या खात्यावर दिले. मात्र, पूर्ण पैसे घेऊनसुद्धा कुलकर्णी कुटुंबीयांकडून अधिक पैशांची मागणी केली जात होती. मात्र, त्यास अॅड. कांबळे यांनी नकार दिला. त्यामुळे कुलकर्णी कुटुंबीयांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.