

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गृहनिर्माण घोटाळ्यात अटकेचे सत्र अधिक तीव्र झाले असून, या प्रकरणातील फिर्यादी असलेले भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपीन काजळे आणि नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील यांना पोलिसांनी बुधवारी (दि.६) रात्री उशिरा अटक केली.
गुरुवारी (दि.७) दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे महसूल, नगररचना आणि बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली असून, आणखी काही अधिकारी आणि विकासक तपासाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी या प्रकरणात मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या बांधकाम व्यावसायिक सोनू मनवानी, नायब तहसीलदार नितीन पाटील आणि दीपक कर्मचंदानी यांना अटक करण्यात आली होती.
त्यापैकी सोनू मनवानी याला न्यायालयातून जामीन मिळाला असला, तरी नितीन पाटील, दीपक करमचंदानी, बिपीन काजळे आणि कल्पेश पाटील हे सध्या पोलिस कोठडीत आहेत.
विशेष म्हणजे, सुरुवातीला या घोटाळ्याची तक्रार देणारे बिपीन काजळे यांचाच तपासात सहभाग निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
फिर्यादीच आरोपी
अलीकडच्या दोन शासकीय घोटाळ्यांच्या प्रकरणांत फिर्यादीच आरोपी झाले आहेत. या अगोदर शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण फिर्यादी होते. म्हाडा घोटाळ्यातही भूमी अभिलेखचे उपाध्यक्ष बिपीन काजळे फिर्यादी होते. तपासानंतर दोघांचाही सहभाग आढळल्यानंतर त्यांना या दोन्ही घोटाळ्यांत आरोपी करण्यात आले आहे.