

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर नाशिक हे केवळ आध्यात्मिक आणि धार्मिक राहिले नसून, ते आता विकासाचे नवे केंद्र बनले आहे. मुंबई आणि पुण्यानंतर लोकांची पहिली ओढ नाशिककडे आहे. खरे तर, पुण्यापेक्षाही जास्त पसंती आता नाशिकला मिळत आहे.
आगामी कुंभमेळा यशस्वीतेसाठी शासन काम करत असून कुंभमेळा नियोजनात प्रथमच उद्योग विभागाला जोडण्यात आले आहे, ही एक अभिनव संकल्पना राबवत असल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री तथा कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण आणि जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकायनि आयोजीत कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते. आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनावर बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, यंदाचा कुंभमेळा हे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान आहे आणि आम्ही ते स्वीकारले आहे. गेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा ४ ते ५ पट जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे.
साधारण १० ते १२ कोटी भाविक नाशिकमध्ये येतील, असा आमचा अंदाज आहे. या भाविकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये आता उत्कृष्ट विमानसेवा आणि रस्ते कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे. लवकरच शहरात कार्गो सेवा सुरू होणार असून, नाशिकरोड रेल्वेस्थानकाचा मोठा विस्तार केला जाणार आहे. नाशिकचा विकास पाहन येथे जमिनींचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.
'हरित नाशिक'चा संकल्प
पर्यावरणाबाबत आपला संकल्प जाहीर करताना मंत्री महाजन म्हणाले की, राज्यात सर्वाधिक वृक्षारोपण आम्ही नाशिक जिल्ह्यात करणार आहोत. नाशिकला झाडांचे शहर बनवून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
इतर मंत्र्यांना कुंभमेळामंत्री करून टाकेन
भाषणादरम्यान मंत्री महाजन यांनी एक मिश्किल आठवणही सांगितली. मुख्यमंत्री मला म्हणाले होते की, जर भाषणाला जास्त वेळ घेतला तर स्टेजवर बसलेल्या इतर मंत्र्यांपैकी कुणालाही मी कुंभमेळा मंत्री करून टाकेन, असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. कुंभमेळ्याच्या नियोजनाची जबाबदारी आणि कामाचा व्याप लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही टिप्पणी त्यांनी हसत-खेळत मांडली.