

नाशिक : सतीश डोंगरे
एप्रिल महिन्यातील उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत, विदर्भातील अकोला (४६.९) सर्वाधिक उष्ण शहर म्हणून पुढे आले. दुसऱ्या क्रमांकावर विदर्भातीलच अमरावतीने स्थान मिळविले. याशिवाय मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही उष्णतेचा कहर दिसून येत आहे. यास बेसुमार वृक्षतोडच कारणीभूत असून, महाराष्ट्रात २०२१ ते २४ या तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे ९.७ हजार हेक्टरवरील जंगलाचा -हास केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
गत वर्षी राज्यात अवकाळी पावसाने मे महिन्याच्या प्रारंभीच बरसण्यास सुरुवात केल्याने, उन्हाळ्याच्या फारशा झळा जाणवल्या नाहीत. यंदा मात्र, एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकत असून, राज्यातील अनेक शहरांमध्ये रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुढील मे महिना हा महाराष्ट्रातील जनतेसाठी तापदायक जाईल असा अंदाज आहे.
१० कोटी वृक्षलागवड मोहिमेचे फलित काय?
राज्यात गाजावाजा करीत 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' या अभियानांतर्गत २०२५ मध्ये १० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली होती. मोहिमेच्या यशस्वीतेची जबाबदारी प्रशासनाच्या २५ विभागांवर सोपविण्यात आली होती. याशिवाय 'एक पेड माँ के नाम २.०' या मोहिमेतूनही वृक्षलागवडीचे शासनाने उद्दिष्ट ठेवले होते. या मोहिमेसाठी आवश्यक निधी जिल्हा योजनांमधून उपलब्ध करून दिला जाणार होता. मात्र, या योजनेचे फलित काय? याबाबत मात्र अद्यापपर्यंत कुठलीही माहिती पुढे येऊ शकली नाही.
२१.२५ टक्केच वृक्षाच्छादन
राष्ट्रीय वननीतीप्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वन आणि वृक्षाच्छादन असणे आवश्यक आहे. परंतु राज्यात वन व वृक्षाच्छादन प्रमाण २१.२५ टक्के इतकेच असून, त्यात सातत्याने घट होत आहे. परिणामी तापमानातील वाढ, हवामान आणि ऋतुबदलाची दाहकता आणि तीव्रता यात सातत्याने वाढ होत आहे.
नाशिकमध्ये २,५०० वृक्षांची कत्तल
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त होत असलेल्या विकासकामांसाठी नाशिकमध्ये आतापर्यंत प्रशासनाकडून अडीच हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली असून, साडेचार हजार वृक्षांची कत्तल अजूनही करणे बाकी आहे. महापालिका प्रशासनाने याबाबतची नोटीसदेखील काढली आहे. तर महापालिकेच्या उद्यान विभागाच्या मते, आतापर्यंत केवळ पाचशे झाडे तोडली असून, आणखी सातशे झाडे तोडायची आहेत.
शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या वृक्ष लागवडीच्या मोहिमा केवळ कागदावर आहेत. वास्तविक, प्रत्येक वर्षी प्रत्येक शहरात किमान एक लाख वृक्षांची लागवड करायला हवी. आपल्याकडे त्यासाठी पुरेशी जागा असून, निधीचीदेखील कमतरता नाही. केवळ इच्छाशक्तीचा अभाव आहे. जर एक लाख झाडे लावले जात असतील तर, धोकादायक वृक्षाची कत्तल करण्यास आमचा 43 विरोध नसेल. आता फक्त वृक्षाची कत्तल केली जात असून, वृक्षलागवडीची बोंब आहे.
- जगबीर सिंग