नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण पोलिसांनी मागील वर्षभरात अवैध धंदेचालकांकडून सुमारे २९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचप्रमाणे ९ हजार ३८७ संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यात सर्वाधिक गुन्हे दारूबंदी कायद्यानुसार दाखल झाले आहेत.
ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदेचालकांवर कारवाई केली. त्यात अवैध मद्यविक्री, वाहतूक किंवा साठा करणाऱ्यांबरोबरच जुगाऱ्यांवरही सर्वाधिक कारवाई केली. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी दोन हजार ८६४ जुगाऱ्यांविरोधात एक हजार ५१ गुन्हे दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे दारूबंदी कायद्यानुसार ग्रामीण पोलिसांनी पाच हजार १९२ जणांविरोधात पाच हजार ९९३ गुन्हे दाखल केले. या गुन्ह्यांमध्ये ग्रामीण पोलिसांनी आठ कोटी २६ लाख ११ हजार ८३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंदेचालकांवर कारवाईसाठी महिला पोलिसांचे विशेष पथक नेमली होती. या पथकांनीही ग्रामीण भागात जाऊन अवैध धंद्यावर कारवाई केली.
ग्रामीण पोलिसांची कारवाई
कारवाई दाखल गुन्हे आरोपी मुद्देमाल
गुटखा ६१७ ९३९ १५,२१,८९,६०१
दारूबंदी ४,९९३ ५,१९२ ८,२६,११,८३१
जुगार १,०५१ २,८६४ २,०३,९०,४०८
जीवनावश्यक वस्तू कायदा १२४ २०० ३,१०,५८,५२०
एन.डी.पी.एस. ५२ ७५ ५१,१९,४३७
एकूण ६,९३९ ९,३८७ २९,१३,६९,७९७
१४३ शस्त्रे जप्त
ग्रामीण पोलिसांनी मागील वर्षभरात ११७ जणांकडून १४३ शस्त्रे जप्त केली आहेत. त्यात ३५ गावठी कट्टे, ४९ जिवंत काडतुसे, ६८ तलवारी, २३ चाकू व १७ कोयते अशा हत्यारांचा समावेश आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यानुसार १०२ गुन्हे दाखल केले आहेत.
शहर पोलिसांनीही गत वर्षात एमडी कारवाई करीत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचप्रमाणे दारूबंदी कायद्यानुसार ३७३ गुन्हे दाखल आहेत. तर जुगार खेळणाऱ्यांविरोधातही १४३ गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही प्रकारांत पाेलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.