

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कॉलेजरोड येथील विसेमळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित सागर सुधाकर बागूल यास उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, याच घटनेतील मामा राजवाडे याचा जामीन अर्ज मात्र फेटाळला आहे. त्यामुळे कायद्याच्या बालेकिल्ल्यात कारागृह असलेल्या सदस्यांमध्ये 'कधी खुशी कभी गम' असे वातावरण आहे.
विसेमळा परिसरात तरुणाच्या दिशेने गोळीबार करून अपहरण केल्याप्रकरणी भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या व गुन्ह्यातील मुख्य संशयित अजय दिलीप बागूल याच्यासह संपूर्ण टोळी गेल्या चार महिन्यांपासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहे.
२९ सप्टेंबरच्या पहाटे रामवाडी व्हाया गंगापूर रोड रस्त्यावर सचिन अरुण साळुंके (२८) याच्या अपहरणासह गोळीबाराचा थरार रंगला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा नोंद असून, संशयित अजय बागूल, सचिन कुमावत व दिलीप जाधव यांना अटक झाली होती.
तर संशयित सागर सुधाकर बागूल, गौरव सुधाकर बागूल, प्रेमकुमार दत्तात्रय काळे, वैभव ऊर्फ विकी दत्तात्रय काळे मामा ऊर्फ बाबासाहेब वाल्मीक राजवाडे, अमोल भास्कर पाटील, संदीप रघुनाथ शेळके यांना त्यापूर्वीच पथकाने बेड्या ठोकल्या होत्या.
त्यापैकी सागर बागूल याला जामीन मंजूर झाला असून, 'कायद्याचा बालेकिल्ला' मोहिमेत या टोळीवरील कारवाई शहरात प्रचंड चर्चिली गेली होती. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही गुन्हेगारांचं कंबरडे मोडणारी मोहीम सप्टेंबर २०२५ महिन्यात सुरू केली होती. यामध्ये अनेकांना जेलची हवा खावी लागली. त्यामधील काही आता बेलच्या प्रतीक्षेत आहेत.
राजवाडेचा मुक्काम वाढला
बारमध्ये ५० हजारांचा हप्ता, दारू दिली नाही म्हणून तोडफोड करत धिंगाणा घातल्याप्रकरणी गुन्ह्यात अटक असलेले संशयित मामा राजवाडे यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. न्यायाधीश के. के. पाटील यांनी त्यांचा जामीन अर्ज शनिवारी फेटाळून लावला. सरकार पक्षाकडून अॅड. सुलभा सांगळे यांनी युक्तिवाद केला.
जगदीश पाटीलबाबतही निर्णय
पंचवटीतील सागर जाधव गोळीबार प्रकरणात तीन महिन्यांपासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक जगदीश चिंतामण पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी (दि. ९) मुंबई उच्च न्यायालयात त्यासंदर्भात सुनावणी होणार आहे.
तर खुनाच्या गुन्ह्यातील संशयित भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या जामीन अर्जाबाबतही मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राहुल धोत्रे हत्याकांडात मुख्य संशयित उद्धव निमसे यांचे जामीन अर्ज या अगोदर तीन वेळा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही माजी नगरसेवकांच्या जामिनाकडे राजकीय वर्तुळासह नाशिककरांचे लक्ष आहे.