

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
केंद्राच्या किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत यंदा नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या खरेदी प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी लासलगाव बाजार समितीत बैठक घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, नाफेडचे व्यवस्थापक अनिकेत मदान, एनसीसीएफचे जिल्हा शाखा व्यवस्थापक श्रीहर्ष, संचालिका सुवर्णा जगताप, व्यापारी संचालक प्रवीण कदम, सचिव नरेंद्र वाढवणे उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शेतकऱ्यांना शासकीय कांदा खरेदी योजनेची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी दर्शनी भागात माहिती फलक लावण्याच्या सूचना दिल्या. आयुष प्रसाद म्हणाले की, मार्केट इंटरव्हेन्शन स्कीमचा मुख्य उद्देश बाजारभावाला आधार देणे हा आहे. गेल्या साडेचार आठवड्यांत कांद्याच्या बाजारभावात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नाफेड आणि एनसीसीएफमार्फत ६२०० मे. टन कांदा खरेदी झाल्याचे त्यांनी सांगितले. खुल्या बाजारातील दर अधिक वेगाने वाढल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कांदा विकण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे शासकीय खरेदीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिले. कमी दर्जाच्या कांद्याचाही शासकीय खरेदीत समावेश करण्यात आला आहे.
या बदलाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी बाजार समित्यांत माहिती फलक उभारण्याची उपाययोजना राबवण्यात येत आहेत. बाजार समिती परिसरातच खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शासकीय खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य आहे.
यापूर्वी शेतकरी नसलेल्या व्यक्तींनी कांदा विकल्याच्या तक्रारी आल्याने ही अट आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चांदवडच्या मका खरेदीतील गैरप्रकारानंतर अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. कांदा खरेदी प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी उपाययोजना केल्या आहेत. आतापर्यंत तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहितीही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली.