

नाशिक : देशभरात नीट परीक्षेतील गोंधळाचा विषय चर्चेत असतानाच आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ उडाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका वेळेत डाउनलोड न झाल्याने ऐनवेळी ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या. मात्र, अनेक केंद्रांवर चुकून २०२४ सालच्या जुन्या प्रश्नपत्रिका पोहोचल्याने परीक्षार्थीसह केंद्र प्रशासनात एकच खळबळ उडाली.
महाराष्ट्रातील ५५८ परीक्षा केंद्रांवर बुधवारपासून मुक्त विद्यापीठाच्या मुख्य (उन्हाळी) परीक्षेला सुरुवात झाली. ५३ शिक्षणक्रम आणि ७७ अभ्यासक्रमांच्या या परीक्षांसाठी विद्यापीठाने पारदर्शकता आणि गैरप्रकार रोखण्यासाठी एआय आधारित सीसीटीव्ही देखरेख प्रणालीचा प्रायोगिक वापर सुरू केला होता. प्रश्नपत्रिका संगणकीय आज्ञावली प्रणालीद्वारे केंद्रांवर पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, सकाळी साडेदहा वाजताच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका तांत्रिक दोषामुळे केंद्रांवर डाउनलोडच झाली नाही. त्यामुळे प्रशासनाने घाईघाईत सर्व केंद्रांना ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठवल्या. त्या झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. मात्र, काही वेळातच अनेक केंद्रांवर
वितरित करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका जुन्या असल्याचे लक्षात आले. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर सुधारित प्रश्नपत्रिका पुन्हा पाठविण्यात आल्या आणि काही ठिकाणी तब्बल तासाभराच्या विलंबाने परीक्षा सुरू झाली. राज्यातील अनेक भागांत उष्णतेची तीव्र लाट असताना विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्ये ताटकळत बसावे लागल्याने त्यांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या गोंधळामुळे विद्यापीठाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
66 परंतु, हा प्रश्न १५ मिनिटांत सोडविला गेला. ज्या केंद्रांवर जुन्या प्रश्नपत्रिका गेल्या, त्या लगेच मागे घेण्यात आल्या. त्या ठिकाणी त्वरित दुसरी प्रश्नपत्रिका पाठवून परीक्षेसाठी एक तासाचा कालावधी वाढवून देण्यात आला.
- प्रा. संजीव सोनवणे, कुलगुरू, मुक्त विद्यापीठ