![सिन्नर : दिव्यांग सशक्तिकरण शिबिरात मार्गदर्शन करताना आमदार बच्चू कडू. समवेत सह्याद्री युवा मंच अध्यक्ष उदय सांगळे, ज्ञानेश्वर ढोली, केरू कोकाटे, गोविंद लोखंडे, अनिल पवार आदी.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F02%2F%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
भारतामध्ये मी पहिला आमदार आहे. गर्वाने सांगतो की, दिव्यांग बांधवांसाठी माझ्यावर २५० गुन्हे दाखल झाले. दिव्यांगांसाठी सेवा हीच ईश्वरसेवा आहे असे मी मानतो. सख्खा भाऊसुद्धा दिव्यांगांना पाहिजे तशी मदत करत नाही पण आम्ही दिव्यांगांसाठी काम करतो. जाती-धर्मासाठी लढलो असतो, तर माझे १५ आमदार निवडून आले असते, असे प्रतिपादन दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले.
स्पार्क मिंडा फाउंडेशन आयोजित प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष आणि सह्याद्री युवा मंच अध्यक्ष उदय सांगळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग सशक्तिकरण शिबिर रविवारी (दि. ४) सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर युवा नेते उदय सांगळे, केरू कोकाटे, ज्ञानेश्वर ढोली, अनिल पवार, गोविंद लोखंडे, दत्तू बोडके, संध्या जाधव, रवींद्र टिळे, शरद शिंदे, वैशाली अनवट उपस्थित होते.
दिव्यांगांची दिव्यांगांच्या आशीर्वादाची लढाई आहे, ज्यांना डोळे नाही, हात नाही, त्यांचे दुःख जाणून पाहा त्यांचे दुःख काय असते. दिव्यांगांसाठी घरकुल योजना तसेच व्यवसायासाठी लागणारे साधन, इलेक्ट्रॉनिक सायकल असेल, ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्यांना सरसकट साहित्य वाटप करु असे आश्वासन आमदार बच्चू कडू यांनी दिले. यावेळी १७९ दिव्यांगांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, कार्याध्यक्ष संदीप आव्हाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. रामदास आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रहार संघटना, सह्याद्री युवा मंच सदस्य व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
दिव्यांगांसाठी नेहमी प्रयत्नशील : उदय सांगळे
उदय सांगळे यांनी सिन्नरसारख्या ग्रामीण भागात दिव्यांगांसाठी चांगला उपक्रम राबविला, त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. हीच भूमिका राज्यभर सगळ्यांनी घ्यावी. आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे दिव्यांगांसाठी मंत्रालय मंजूर झाले. शीतल सांगळे या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना दिव्यांगांसाठी अनेक योजना राबविल्या गेल्या. तसेच राखीव निधीचे पूर्ण वितरण करण्यात आले. कोणताच दिव्यांग बांधव शासकीय योजनेपासून वंचित राहू नये यासाठी हा उपक्रम राबविला आहे. दिव्यांग बांधवांसाठी नोंदणी, पेन्शन, रोजगार यासाठी प्रयत्न करणार आहे. जातपात न पाहता दिव्यांगांसाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील काम करणार असल्याचे सांगळे यांनी नमूद केले.