नाफेड, एनसीसीएफ करणार ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी

नाफेड, एनसीसीएफ करणार ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेचा रणसंग्राम सुरू असताना, एनसीसीएफ (भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना) आणि नाफेड (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघटना) यांंनी चालू वर्षात पाच लाख टन कांदा खरेदीची घोषणा शुक्रवारी (दि. १२) घोषणा केली. कांदा खरेदीतून १ हजार कोटी रुपयांचा गुंतवणूक शासन करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. निर्यातबंदीमुळे अगोदरच संकटात असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अधिक राेष पसरण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, ही घोषणा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

बाजारात सध्या उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. तसेच निर्यातबंदीच्या धोरणामुळे बाजारात सध्या कांद्याचे दर स्थिर असले, तरी कांद्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या दरामुळे शेतकरी नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर एनसीसीएफ व नाफेडच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी नाफेडचे सहायक विपणन व्यवस्थापक सुनीलकुमार सिंग, एनसीसीएफचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार आय. एस. नेगी, विपणन संचालक ॲनी जोसेफ चंद्रा, एस. सी. मित्तल आदी उपस्थित हाेते.

एनसीसीएफ व नाफेडमार्फत चालू वर्षी ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केली जाणार आहे. खरेदीत या दोन्ही संस्थांचा प्रत्येकी ५० टक्के वाटा असणार आहे. त्यासाठी १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करताना बाजारमूल्य विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे एनसीसीएफ व नाफेडकडून १५०० रुपये क्विंटलला दर दिला जाऊ शकतो. मात्र, खरेदीची ही किंमत उत्पादन खर्चाच्या जवळपास सारखीच असून, येत्या काळात या दोन्ही खरेदी सुरू केल्याने दर अधिक घसरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू शकताे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना अधिकाऱ्यांनी अशी घोषणा करणे कितपत योग्य आहे, यावरून आता चर्चेला उधाण आले आहे.

तीन दिवसांमध्ये पैसे बँक खात्यात

शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या बँकखात्यात वर्ग केले जाणार आहे. त्याकरिता ॲप तयार केले आहे. शेतकऱ्यांकडून कांदा घेतल्यानंतर तीन दिवसांत डीबीटीद्वारे खरेदीची रक्कम बँकखात्यात वर्ग होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. परंतु, खरेदीवेळी कांद्याची प्रतवारी पाहुनच तो खरेदी करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

यंदा २० टक्के घसरण

गेल्या वर्षी बफर स्टॉक अंतर्गत सुमारे ६.४ लाख टन कांदा एनसीसीएफ आणि नाफेडने खरेदी केला होता. त्यावेळी सरासरी १७ ते २० रुपये किलो असा भाव देण्यात आला. शेतकऱ्यांना चांगले दाम मिळाल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. सध्या बफर स्टॉक जवळपास संपुष्टात आला आहे. महाराष्ट्रात सध्या कांद्याची किरकोळ किंमत १४-१५ रुपये किलो आहे. कृषी मंत्रालयाच्या अभ्यासानुसार यावेळी रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन १९०.५ लाख टन होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या एकूण कांदा उत्पादनाच्या तुलनेत यंदा २० टक्के घसरण होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news