

येवला : पुढारी वृत्तसेवा
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पातून लासलगाव-पाटोदा-नगरसूल राज्य महामार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल ३४० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली असून, या रस्त्याची रुंदी १० मीटर असणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे येवला मतदारसंघातील ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम होणार असून शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ केंद्र म्हणून ओळखली जाते. लासलगाव-पाटोदा-नगरसूल हा मार्ग कृषी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात कांदा, भाजीपाला, धान्य तसेच इतर कृषिमालाची वाहतूक केली जाते.
या रस्त्यावरील दळणवळण लक्षात घेऊन या मार्गाचे काँक्रिटीकरण व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यापूर्वी ही मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पिंपळस ते येवला या महत्त्वाच्या चौपदरी मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी ५६० कोटी रुपये तसेच लासलगाव-विंचूर चौपदरी काँक्रिटीकरणासाठी १३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, या रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत.
आता लासलगाव-पाटोदा-नगरसूल मार्गालाही काँक्रिटीकरण करण्यासाठी ३४० कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने येवला-लासलगाव परिसरातील रस्ते विकासाच्या कामांना आणखी बळ मिळाले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे येवला मतदारसंघ आणि परिसरातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला जाणार असून, दळणवळण व्यवस्था अधिक आधुनिक आणि सक्षम होणार आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ही विकासकामे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
वाहतूक खर्च आणि वेळेत बचत
रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जलद आणि सुरक्षितपणे पोहोचविता येणार आहे. वाहतूक खर्चात बचत होणार असून, मालाच्या वाहतुकीस लागणारा वेळही कमी होणार आहे. तसेच या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील उद्योग, व्यापार आणि आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार आहे.
हा मार्ग केवळ वाहतुकीचा रस्ता नसून तो हजारो शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी जोडलेला जीवनमार्ग आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीला मोठी चालना मिळेल, बाजारपेठांशी संपर्क वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल. पिंपळस येवला, लासलगाव-विंचूर आणि आता लासलगाव-पाटोदा-नगरसूल अशा सलग मंजुरी मिळालेल्या रस्ते प्रकल्पांमुळे परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.
- समीर भुजबळ, माजी खासदार