Meeting of Shiv Sena Shinde Group : शिंदे सेनेच्या बैठकीत स्वबळाचा आग्रह
नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका महायुती म्हणून लढणार अशी घोषणा भाजपकडून केली जात असली तरी, भाजपकडून तयारी मात्र स्वबळाची सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या भरवशावर राहू नका, आपणही स्वबळासाठी तयार राहिले पाहिजे, अशी आग्रही मागणी शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी समितीतल्या प्रमुख नेत्यांना करून दिली. यावेळी महायुतीसाठी शिवसेना सकारात्मक असून वेळ पडल्यास स्वबळाचीही तयारी असल्याचा विश्वास पक्षाचे नेते तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सभासद वाढवा, सभासद दिसतील तरच स्वबळावर लढता येईल, नुसते हवेत गोळीबार नकोत अशा कानपिचक्याही यावेळी नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी(दि.११) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उपनेते राहुल शेवाळे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मोरे यांची समिती गठीत केली असून या समितीच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह जळगाव, धुळे, नंदूरबार व अहिल्यानगर जिल्ह्यातील संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला गेला.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील व्यस्था नेत्यांसमोर मांडल्यात. यावेळी महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी महायुती होणार की नाही याबाबतचे आश्वसन नेत्यांकडून मागितले. भाजपकडून सध्या स्वबळाची तयारी केली जात आहे. भाजप नेत्यांची वक्तव्ये पाहता, भाजप महायुती म्हणून निवडणूक लढणार नाही, असा निष्कर्ष सर्वच जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी समितीतील नेत्यांसमोर मांडला. स्वतंत्र लढायची तयारी करा किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युतीबाबत चाचपणी करण्याचा आग्रह धुळे, अहिल्यानगर, जळगाव येथील पदाधिकाऱ्यांनी धरला. पदाधिकऱ्यांची भूमिका वरीष्ठांना कळवू असे आश्वासन समिती सदस्यांनी यावेळी दिले.
भाजपविरोधात तक्रारीचा पाढा
शिंदे सेनेच्या बैठकीत उपस्थित बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. भाजप आपल्याला सोबत घेणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्यावर सचिव संजय मोरे यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. नुसतेच हवेत गोळीबार नको, स्वतंत्र लढायचे असेल तर तुमचे सभासद किती याची विचारणा वरीष्ठ करतील, तेव्हा आम्ही त्यांना काय सांगू? असा प्रतिसवाल करत प्रत्येक मतदारसंघात लाखाच्या वर सभासद दिसतील, तुमची ताकद दिसेल तर भाजपवाले तुमच्याकडे युतीसाठी येतील असा सल्लाही समिती सदस्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला.
