

सनमाड : पुढारी वृत्तसेवा
शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर महामार्गाला खेटून असलेली अतिक्रमणे सोमवारी जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. नगर परिषद प्रशासन, पोलिसांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. काही राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध केला होता.
अतिक्रमणामुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण दाखवून ही मोहीम राबविण्यात आल्याचे पालिका प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. वाहतूक कोंडी होण्यासाठी अतिक्रमण हे एकमेव कारण आहे का? इतर ठिकाणची वाहने या मार्गावर वळविण्यात आली त्याचे काय?
वाहतूक कोंडी सुटावी यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महामार्गावरून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घातलेली असताना त्यांच्या आदेशाला केराची टोपली कोणी दाखवली? त्याची अंमलबजावणी का केली जात नाही, असे एक ना अनेक प्रश्न कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या टपरीधारकांनी केले.
शेकडो तरुणांना बेरोजगार करून वाहतुकीची कोंडी सुटणार आहे का? असा सवालदेखील राजकीय पक्ष आणि संघटनांनी उपस्थित केला आहे. महामार्गावर रोज तासन्तास वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली होती. त्यात काही वेळा रुग्णवाहिका, एसटी बसेसदेखील अडकल्या होत्या.
वाहतूक कोंडीला अनेक कारणे असताना केवळ महामार्गाला खेटून असलेल्या टपऱ्या आणि छोटी दुकाने कारणीभूत असल्याचा कांगावा करत सोमवारपासून पालिका प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली.
मोहीम सुरू करण्याअगोदर अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे काहींनी मोहीम सुरू होण्याअगोदर स्वयंस्फूर्तीन त्यांचे अतिक्रमण काढून घेतले होते. सकाळी नगिना मस्जिद समोरून मोहीम सुरू करण्यात आली.
मुख्याधिकारी शेषराव चौधरी जेसीबी घेऊन त्यांच्या पथकासोबत तर पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन, पोलिस निरीक्षक विजय करे पोलिसांचा ताफा घेऊन आल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे पुणे-इंदूर महामागनि मोकळा श्वास घेतला.