

Cracks on Shevge Darna Bridge Raise Dindori-Like Accident Fears
देवळाली कॅम्प : युती शासन काळात १९९५ ते २००० दरम्यान बांधण्यात आलेला दारणा नदीवरील शेवगे दारणा येथील पुलाला तडे गेले असून, संरक्षक जाळ्या तुटल्या आहेत. २५ वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या या पुलाची झीज झाली असून, तो वाहतूकीसाठी धोकादायक ठरला आहे आणि याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पुलाच्या जाळ्या तुटल्यामुळे पावसाळ्यात रात्रीच्या वेळी वाहने नदीत पडून दिंडोरीसारखी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
१९९५ मध्ये राज्यात भाजप सेनेचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व नाशिकचे तत्कालीन पालकमंत्री बबन घोलप यांनी शेवगे दारणा व नानेगाव येथे दारणा नदीवर पुलाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. पाच वर्षे काम चालल्यानंतर पुढे कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात पुलाचे काम पूर्ण होऊन लोकार्पण झाले होते. गेल्या २५ वर्षांपासून या पुलाच्या देखभाल - दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पुलाला ठिकठिकाणी भेगा पडल्या असून, काँक्रीट उखडले आहे. दोन्ही बाजूंच्या संरक्षक जाळ्या अनेक ठिकाणी कमकुवत होऊन तुटलेल्या आहेत.
पावसाळ्यात पाणी पुलावरून
गेल्या चार पाच पावसाळ्यांत या पुलावरून पाणी वाहात असल्यामुळे पूल कमकुवत झाला आहे. संरक्षक जाळ्या तुटल्यामुळे रात्रीच्या वेळी मोठा अपघात होऊ शकतो. वेळीच दक्षता घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी अरुण पाळदे, एकनाथ पाळदे, प्रभाकर कासार, दत्तू कासार, दत्तू कासार, भाजप सरचिटणीस शरद कासार आणि शेवगे दारणा ग्रामस्थांनी केली आहे