

नाशिक : बाह्य परिक्रमा मार्गासाठी २५ गावांमधील ६५.५ किमी पैकी ५५ किमी क्षेत्राचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात १९ गावांचा समावेश आहे. तर चार गावांमध्ये पेसा व न्यायालयीन कारणास्तव, तर दोन गावांत मोजणी प्रक्रिया बाकी असल्याने भू संपादन प्रक्रिया प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता नियंत्रणासाठी ६५.५ किलोमीटरचा बाह्य परिक्रमा मार्ग प्रस्तिवित आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, २५ गावांमधून जमीन या रिंगरोडसाठी बाधित होत आहे.
त्यासाठी शासकीय प्रक्रिया पूर्णत्वाकडे आली आहे. महिनाभरात ती पूर्ण होईल. २५ पैकी १९ गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया पूर्णत्वाकडे आली आहे. ४ गावांमध्ये पेसा क्षेत्र व न्यायालयीन प्रकरणामुळे प्रलंबित आहे. दोन गावांची जमीन मोजणी बाकी आहे. महिनाभरात थेट खेरदीस संमती दिलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्व भूसंपादन प्रक्रिया पार पडेल, ज्यांचे भूसंपादन होत आहे त्यांना मोबदला रक्कम दिली जात आहे. साधारण ५५ किमी भूसंपादन पूर्ण झाली आहे. लवकरात लवकर उर्वरित भूसंपादन करून बाह्य रिंगरोडच्या कामाचा शुभारंभ करण्यात येईल, असे यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस, माजी राष्ट्रपती कोविंद नाशिक दौऱ्यावर
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मे रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत गोदाआरती होणार आहे, त्यानंतर येथील काळाराम मंदिराला ते भेट देणार आहेत. यावेळी त्र्यंबकेश्वर येथील ध्वजस्तंभाचे ऑनलाइन उद्घाटन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.